ठाकरे गटाच्या १६ पैकी ११ उमेदवारांची माघार, रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोडी, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप

SHARE:

लातूर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगानं राजकीय घ़डामोडी घडत आहेत. लातूर जिल्ह्यातही नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. रेणापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे १६ पैकी तब्बल ११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या माघार घेण्याच्या निर्णयामुळं लातूरजिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा उमेदवारांनी केला आरोप

पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली होती. २०१७ निवडणुका झाल्या होत्या.पहिल्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ, आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळते. भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ११ लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळत आहे.

माघार घेतलेले उमेदवार आणि प्रभाग :

ललिता बंजारा नगराध्यक्ष

अनुसया कोल्हे प्र. ०३

महेश व्यवहारे प्र. ०५

गोविंद सुरवसे प्र. ०६

रेखा शिंदे प्र. ०८

रेहानबी कुरेशी प्र. १०

छाया आकनगीरे प्र. ११

राजन हाके प्र. १२

धोंडीराम चव्हाण प्र. १३

शांताबाई चव्हाण प्र. १४

बाबाराव ठावरे प्र. १७

धीरज देशमुख यांनी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे नेते धीरज देशमुख यांनी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलंय असे राजकीय क्षेत्रात बोललं जात आहे. शिवसेनेच्या ११ उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही खेळी काँग्रेसचीच आहे असा विरोधक आरोप करत आहेत. या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक रणधुमाळीत मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. रेणापूरच्या चौरंगी लढतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माघारीमुळे फायदा कोणाला तोटा कोणाला याची गणितं आता घातली जात आहेत.

Leave a Comment