अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम…

SHARE:

परभणीनगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. स्थानिक नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी आता बडे नेतेही मैदानात उतरले असून नेत्यांच्या सभा होत आहेत. अशातच परभणीच्या जिंतूरमध्ये काल (सोमवारी) अजित पवारांची सभा पार पडली. यावेळी बोलताना अजित पवारांनी जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धरतीवर करू, हा विकास करणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नसल्याची टीका भाजप नेत्या तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर केली होती. यानंतर मेघना बोर्डीकरांनी ही अजित पवारांना चौख प्रत्युत्तर दिले.

कायम सत्ता केंद्र हे बारामतीत, दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिला – मेघना बोर्डीकर

कायम सत्ता केंद्र हे बारामतीत राहिला आहे. अजित दादांनी बारामतीला दहा रुपये लागत असतील तर शंभर रुपये निधी दिलेला आहे. त्यामुळे बारामतीचा विकास होणारच ना, असाच विकास इतर नगर पालिकांचा का झाला नाही? जिंतूर नगर परिषदेवर त्यांच्याच राष्ट्रवादीची सत्ता होती मग जर अजित पवारांनी निधी दिला ही असेल तर यांनी तो निधी घरी ठेवला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादी काट्याची लढत

परभणीच्या जिंतूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. समोर पालकमंत्री असो की अजून कोणी, जिंतुरकर आम्ही केलेल्या विकासाकडे बघून मतदान करतील. यांनी केवळ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार करायचा आणि तोच पैसा निवडणुकीसाठी वापरायचा हा फंडा यांचा आहे. मात्र जिंतूरकर यंदा या आमिषाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास भांबळे यांनी व्यक्त केलाय. तसेच भाजपला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही कांग्रेस सोबत युती केल्याचेही विजय भांबळे यांनी सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या निवडणुकांसाठी प्रचार दौरे करत आहे. सोमवारी त्यांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सभा घेतल्या. यावेळी, मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो असे म्हणत इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारचोट असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. तर मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप-प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या भागात करून दाखवलं तेव्हा तुमच्याकडे येऊन बोलतोय. मात्र, बाकीचे नेते, त्यांची शहरं भिकारचोट असतात‌, असे म्हणत अजित पवारांनी बीड जिल्ह्यातून इतर नेत्यांवर हल्लाबोल केला. अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं. आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं. हे वागणं बरं नव्हं हे लक्षात ठेवा, असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना लक्ष्य केलं.

Leave a Comment