
आयसीसी टी-२० विश्चचषक २०२६ च्या स्पर्धेचे आज वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ ची स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील, ज्यांना प्रत्येकी पाच संघांच्या गटात विभागले जाईल.
टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने –
भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. तर श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडीच्या मैदानात टी-२० चे सामने होतील. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल.
विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये –
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना ८ मार्च रोजी होऊ शकतो. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे खेळवला जाऊ शकतो. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाहीय. त्यामुळे पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचल्यास टी-२० चा अंतिम सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल.
भारताचे टी-२० विश्वचषकातील साखळी फेरीतील सामने (संभाव्य वेळापत्रक) –
- ७ फेब्रुवारी, मुंबई – भारत विरुद्ध अमेरिका (स्पर्धेचा उद्घाटन सामना)
- १२ फेब्रुवारी, दिल्ली – भारत विरुद्ध नामिबिया
- १५ फेब्रुवारी, कोलंबो – भारत विरुद्ध पाकिस्तान
- १८ फेब्रुवारी, अहमदाबाद – भारत विरुद्ध नेदरलँड्स
- २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सर्व चार ग्रुप (संभाव्य)
- ग्रुप १ – भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स.
- ग्रुप २ – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
- ग्रुप ३ – इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ.
- ग्रुप ४ – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा.
टी-२० विश्वचषकासाठी कोणत्या २० संघांचा समावेश?
भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश, आयर्लंड, कॅनडा, इटली, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई
भारताने दोनवेळा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव –
भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी दोनवेळा आयसीसी टी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहे. टी-२० विश्वचषक २००७ मध्ये सुरू झाला. पहिल्या हंगामात भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकात भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.




