दक्षिण आफ्रिकेनं मालिका २-० नं जिंकली; मायदेशात सलग दुसऱ्या मालिकेत भारताची हार, टीम इंडिया तोंडावर आपटली!

SHARE:

गुवाहाटी – पहिल्या कसोटीनंतर टीम इंडियाला आता दुसऱ्या कसोटी सामन्यात पण लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. कोलकातातील पहिला कसोटी भारत ३० धावांनी हरला होता, तर दुसऱ्या कसोटी ३८० धावांनी लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचे सगळे ५ दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिले. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी ४०८ धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या डावात भारताला १४० धावांत गुंडाळले.

दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात केले ४८९ धावा

नाणेफेक जिंकून टेम्बा बावुमानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एडन मार्क्रम (३८) आणि रयान रिकेल्टन (३५) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात दिली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स (४९) आणि बावुमा (४१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. तर खालच्या क्रमातील मार्को यान्सेननं ९३ धावांची झंझावाती खेळी करीत आफ्रिकेला ४८९ धावांपर्यंत नेलं.

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा सेनुरन मुथुसामीने केल्या. २ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने त्याने १०९ धावांची शानदार खेळी करून आपलं पहिलं टेस्ट शतक झळकावलं. भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने ४  बळी घेतले, पण त्याची इकॉनॉमी ३.९४ इतकी महागडी ठरली. बुमराह आणि लागला प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या, पण दोघेही धावा रोखण्यात अपयशी ठरले.

पहिला डाव २०१ धावांवर संपला

भारतासाठी यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल याने पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची चांगली भागीदारी केली. पण मधल्या फळीत पुन्हा एकदा निराशा पाहायला मिळाली. भारत ९५/१ वरून एका क्षणात १२२/७ असा कोसळला, केवळ २७ धावांत तब्बल ६ विकेट्स पडल्या. साई सुदर्शन (१५), ध्रुव जुरेल (०), ऋषभ पंत (७), रवींद्र जडेजा (६), नितीश कुमार रेड्डी (१०) अपयशी ठरले. मार्को यान्सेननं या डावात ६ विकेट्स घेतल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदर (४८) आणि कुलदीप यादव (१९) यांनी दिलेल्या संयमी साथीनं भारत कसाबसा २०० धावांचा टप्पा ओलांडू शकला.

भारतासमोर ५४९ धावांचं प्रचंड लक्ष्य

पहिल्या डावात २८८ धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा डाव २६०/५ वर घोषित केला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्स ९३ धावांनी शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचा विकेट पडताच बावुमानं डाव घोषित केला. आणि दुसऱ्या डावात भारताला १४० धावांत गुंडाळले आणि ४०८ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. याआधी २००४ मध्ये नागपूरमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने ३४२ धावांनी पराभव केला होता.

Leave a Comment

अधिक वाचा