
गुवाहाटी : भारतविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेने २ –० अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला ४०८ धावांनी पराभूत केलं. ५४९ धावांचं आव्हान गाठताना भारत १४० धावांतच गारद झाला. धावांचा विचार करता भारताचा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेनं तब्बल २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली.
भारताला मायदेशातच सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये व्हाईटवॉशला सामोरं जायला लागलं. न्यूझीलंडनं ३–० ने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही २–० ने हरवलं. दुसऱ्या गुवाहाटी कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेतल्यानंतर रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आता गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सामना संपल्यानंतर आता गौतम गंभीरने राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.
गौतम गंभीर राजीनाम्यावर काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून करा, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ केला. तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली चँपियन्स ट्रॉफी, आशिया चषक ही स्पर्धा जिंकली हेही लक्षात ठेवा, असं गौतम गंभीरने दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सांगितले.
गौतम गंभीरच्या काळात टीम इंडियाची ‘गंभीर’ परिस्थिती –
- ३६ वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पराभवाचा धक्का.
- १९ वर्षांनी टीम इंडिया बंगलुरूच्या चिन्नास्वामीवर कसोटी हरली.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून मालिका गमवावी लागली.
- १२ वर्षांनी भारताला घरच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला.
- १२ वर्षांनी टीम इंडिया मुंबईच्या वानखेडेवर कसोटी हरली.
- कसोटीमध्ये पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३ –० ने क्लीन स्वीप.
- १३ वर्षांनी मेलबर्नमध्ये कसोटी पराभव.
- १० वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हातची गेली.
- १२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टेस्ट मालिकेत ३ सामने गमावले.
- पहिल्यांदाच टीम इंडिया WTC फायनलसाठी क्वालिफाय करू शकली नाही.
- लीड्सवर ५ शतकं करूनही कसोटी हरलेली जगातील पहिली टीम.
- लीड्समध्ये ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारत फक्त दुसऱ्यांदा ३५०+ धावांचं बचाव करण्यात अपयशी.
- १२४ धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही, हे भारताचं घरच्या मैदानावर सर्वात कमी लक्ष्य अपयश.
- २५ वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव.




