मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, धारदार सत्तूर अंगावर सपासप चालवली, राम खाडेंची प्रकृती चिंताजनक…

SHARE:

अहिल्यानगर – शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, हिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे गाडीतून जात असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. सुरुवातीला या हल्लेखोरांनी गाडीची नासधूस केली. हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. तसेच गाडीचे साईड मिरर फोडले. यानंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला. राम खाडे यांनी काही वार हातावर झेलले. परंतु, इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

राम खाडे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची शुद्ध पूर्णपणे हरपली होती. त्यांचा हात रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतु, राम खाडे यांच्यावर हल्ला कोणी केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले.

नेमकं काय घडलं?

सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी १०  ते १५  जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Leave a Comment

अधिक वाचा