हे फडणवीसांचं सरकार आहे, जास्त कराल तर कापून काढू; BJP आमदाराची विरोधकांना उघड धमकी

SHARE:

नागपूर : रेती माफियांना पक्षात घेतल्याबद्दल पक्षश्रेष्ठींबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत खळबळ उडवून देणारे सावनेरचे भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी निवडणूक प्रचारसभेत बोलताना आशिष देशमुख यांनी विरोधकांना थेट कापून काढण्याची धमकी दिली आहे. देशमुख यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून याचे तीव्र पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.

नगर परिषद, नगर पंचायतच्या निवडणुकीत मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय नेते मंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आरोप- प्रत्यारोप करताना वादग्रस्त वक्तव्य हेही राजकीय मंडळींकडून होत आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात आमदार देशमुख हे, ”हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू”, असे विरोधकांना उद्देशून बोलत आहेत. विशेष म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी सभेला उपस्थित होते. देशमुख यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही अपलोड केला आहे . दोन दिवसांआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आले होते . त्याला प्रतिउत्तर देताना आमदार देशमुख यांनी ही भाषा वापरली आहे. सभेमध्ये बोलताना देशमुख यांनी, ‘कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका आहे . प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्याला निवडून द्या’ , असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा