ठाकरेसेनेची मुलुखमैदानी तोफ पुन्हा कडाडली, संजय राऊत आजारपणानंतर माध्यमांसमोर; विरोधकांना धारेवर धरलं

SHARE:

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. अशातच राज्यातील १९  नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या सर्व गदारोळात आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आजारपणानंतर साधारण महिनाभराने पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले आहेत. ३०  ऑक्टोबर रोजी त्यांचा माध्यमांशी शेवटचा संवाद झालेला होता. त्यानंतर त्यांनी आज परत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

मागील महिनाभरापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक मत मतांतर पाहायला मिळाले. राजकीय चिखलफेक देखील निदर्शनास आली. तर तळ कोकणातील राणे बंधूंचा संघर्ष हा सुद्धा बराच चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव देखील नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची ही मागील महिनाभरापासून शांत बसलेली तोफ आज पुन्हा कडाडली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

‘आता तब्येतीत सुधारणा होतेय, यापुढे अजून तब्येत सुधारेल. डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होऊन मी पुन्हा येणार आहे. माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारामध्ये नक्की फिरलो असतो. निवडणुका उद्या आहेत, आणि शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी सांगितलंय की, आज लक्ष्मी दर्शन होणार आहे. आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झालंय याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. तर सकाळपासून लोक जागी आहेत. मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागेच आहेत. काही ठिकाणी १०  हजार आणि १५  हजार एका मतामागे असं सुरुय. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीने सुरुय, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्यावेळी पैशांचा खेळ एवढा कधी झाला नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या मुळात मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री लढवत नसतात, त्या स्थानिक पातळीवर लढत असतात’, असं संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

‘आता मी पाहिलं की पाच-पाच, सहा-सहा हेलिकॉप्टर आणि खासगी विमानं येताय. हे कधी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत झालेलं नव्हतं. अशा पद्धतीने एका एका नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी तीन-तीन कोटींचा बजेट आहे. हे सत्तेतल्या तीन पक्षांची स्पर्धा आहे. आतापर्यंत आम्ही या निवडणुका लढल्या, आम्ही या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांवर सोडल्या आणि आताही सोडल्या आहेत’, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा