
मुंबई : प्रभाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी यंदा मुंबई महानगरपालिकेने परीक्षा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी घेतलेल्या भरती परीक्षेचा निकाल लागून जवळपास ४५ दिवस उलटले असले, तरीही अद्याप महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य प्रभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी हे पद महत्त्वाचे आहे. खाद्यपदार्थ विक्री परवाने, शुश्रुषागृह परवानगी आणि इतर सार्वजनिक आरोग्यविषयक परवाने यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामधील ही पदे अनेक वर्षांपासून अंतर्गत भरतीद्वारे मुलाखतीच्या माध्यमातून भरली जात होती. त्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले होते. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑक्टोबरला परीक्षा पार पडली.
परीक्षेच्या दिवशी सकाळी ११ वाजता होणारी परीक्षा दुपारी घेण्यात आली. यावेळी ही परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. या अचानक झालेल्या बदलामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरती होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र निकाल लागून ४५ दिवस झाले, तरीही मुंबई महापालिकेकडून यासंदर्भात कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही. मुंबई महापालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश वाल्लेपवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.
निवड प्रक्रिया पारदर्शक हवी –
वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना अतिरिक्त पाच ते दहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही निवड प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.




