
ठाणे : ‘मतदारयाद्या येत्या १० डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत. २२ डिसेंबरला प्रभागनिहाय मतदारयाद्या देण्यात येणार आहेत. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १५ ते २० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू शकते. तसेच १५ ते २० जानेवारीपर्यंत निवडणुकाही होऊ शकतात,’ असे भाकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात वर्तवले. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणूक आणि इतर महापालिका निवडणुकांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना कधीही विकासकामे काम करत नाही. ३६५ दिवस आम्ही सर्वसामान्य जनतेत असतो. २४ तास नागरिकांमध्ये राहून आम्ही काम करतो. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ देत, आमचे शिवसैनिक नेहमीच सज्ज असतात,’ असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून ठाणे शहरातील विविध भागांत जलतरण तलाव, समाजभवन, स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. घोडबंदर रोड येथील आनंदनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी अशा दोन जलतरण तलावांचे, तसेच फुटबॉल टर्फचेही लोकार्पण पार पडले.
दुसरीकडे, महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने पालिकेतही घडामोडींना वेग आला आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन सध्या सुरू असलेली विकासकामे, मान्यता मिळालेले विषय, निविदा प्रक्रिया आणि कार्यादेशांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला, तर पालिकेच्या पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांचे सत्रही लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार सध्या नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. यानंतर जिल्हा परिषद व पंचायतींच्या निवडणुका व त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील, असे बोलले जात आहे. मात्र, आधी महापालिका निवडणुका व त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायतींच्या निवडणुका होतील, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापालिकांच्या आयुक्तांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे.




