
मुंबई – राज्यात काही दिवसांपासून थंडीसह गारवा जाणवायला लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस जरी थंडी जाणवते तरी दुपारी तापमान वाढलेलं दिसतं. मात्र जसजसा डिसेंबर हिना पुढे सरकत आहे, तसतसं राज्यातला तापमानाचा पारा खाली सरकताना दिसत असून आता वातावरणात हलका बदल जाणवायला लागला आहे. गेले काही दिवस थंडी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा हुडहुडी भरायला सुरूवात होणार आहे. मुंबई-पुण्यातही गारव्याचं वातावरण जाणवायला लागलं आहे. मुंबईत आज सकाळी बऱ्यापैकी गारवा जाणवला, तर पुणेकरांनाही आता त्यांचे स्वेटर्स, जॅकेट्स बाहेर ठेवावे लागणार आहेत. राज्यात इतर ठीकाणीही वातावरण गार असून पारा खाली सरकल्याने हुडहुडी वाढणार आहे.
सध्या पालघरमध्ये गारवा अधिक असून सकाळी तापमान १६–१७°C नोंदवले जाईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी १७–१९°C पर्यंत थंडी जाणवेल, तर दुपारी तापमान ३०–३२°C राहील. कोकणात हवामान स्वच्छ, आणि कोरडे राहू शकते.
राज्यात विदर्भात बरीच आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवत आहे. दरम्यान हवामान विभागाने पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता आहे.
धुळ्यात वाढली थंडी, तापमानाचा पारा घसरला
धुळे शहराचा, जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा ५.४ अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. त्याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानात सतत घट होत आहे. थंडीमुळे धुळेकरांची त्रेधातिरपीट उडाली असूल तरी थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना मोठा फायदा होत आहे.
तर नाशिकमध्ये निफाड येथेही थंडीचा पारा खाली सरकताना दिसत आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानची नोंद झाली. अचानक थंडीच्या लाटेत वाढ झाल्यामुळे पारा ११ अंश सेल्सिअस वरून खाली घसरून ६.४ अंशावर आला. त्यामुळे ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान थंडीत अचानक वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी मात्र वाढली असून फुगवणीच्या स्टेजला असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची द्राक्ष उत्पादकांना भीती.
तसेच गोंदियाही गारठलं असून तिथे पारा ८.२ अंशांवर पोहोचला आहे. हे यंदाचे सर्वांत कमी तापमान असून लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार ११ डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं.




