महायुतीतीलच एका पक्षाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला, पण फडणवीसांना ती भीती…; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा..

SHARE:

नागपूर: “सरकारमधील एका गटाचे २२  आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत,” असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपुरातील विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला. “सत्ताधारी पक्षातूनच दोन विरोधी गट तयार होण्याची भीती मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद सध्या रिकामे आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रस्तावामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. सत्तेमध्ये 5सध्या एक पक्ष दोन गट आहेत. त्यातील एका गटाचे २२  आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले आहेत. गेल्या एका वर्षाचा अभ्यास केला असता ही मंडळी उठ म्हटले तर उठतात आणि बस म्हटले तर बसतात. ते मुख्यमंत्र्यांच्या इशारावर नाचताहेत,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे हे इंडिगोच्या विमानाने येत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका इंडिगोमुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची थट्टा उडविण्यासाठी होती की त्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी, याचा विचार करायला हवा. काल स्वत: मुख्यमंत्री चार्टर विमानाने आले. त्यांचे विमान दोनवेळा मुंबईला गेले. दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे आमदार चार्टर विमानाने आलेत. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचारासाठी हेलिकॉप्टरने फिरलेत. ते गाडीने का फिरले नाहीत. एका उपमुख्यमंत्र्यांच्या गावी जायला रस्ता नाही पण तिथे हेलिकॉप्टर जातो. ते आत्ताच्या निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टरने बॅगा भरून कुठला आनंदाचा शिधा वाटत होते, याचे उत्तर मिळायला हवे. प्रचारात काही तासांसाठी जातात आणि मोठाल्या बॅगांमधून आनंदाचा शिधा वाटतात. २०१४  पूर्वी वेगवेगळ्या एअरलाइन्य कंपन्या कार्यरत होत्या. त्यानंतर या कंपन्या संपविण्यात आल्या. त्यामुळे एका कंपनीची मक्तेदारी झाली आहे. केंद्र सरकारचेदेखील ही कंपनी ऐकत नाही. त्यावर सरकारसुद्धा काही करत नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, पण सरकार अधिवेशनबाबत गंभीर नाही. त्यामुळेच अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे. सरकारची नजर केवळ पैशांवर आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश
“नाशिकमध्ये तपोवन, मुंबईमध्ये संजय गांधी उद्यान येथे वृक्षतोड होणार आहे. नागपूरमध्ये अजनीवन संपविण्याचा प्रयत्न होता. मी मंत्री असताना ते काम थांबविले होते. महामार्ग, बोगदे, रोपवे आदींच्या नावावर पर्यावरणाचे नुकसान कसे करायचे हे भाजपला चांगले माहिती आहे. ताडोबामध्ये खनिकर्म सुरू होणार आहे. मेळघाटची वाट लावली आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश सुरू आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा