
रायगड : उरण–नवघर–खोपटा रस्त्यावरील बामण लँडी यार्डजवळ सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी झालेल्या भीषण अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (वय ३८ ) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी काहीकाळ रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमोल ठाकूर हे मोटारसायकलवरून खोपटा गावाच्या दिशेने जात होते. नवघर–खोपटा रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर ट्रेलरने अमोल यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रेलरने अमोल यांना काही अंतरावर ओढत नेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, कंटेनरचा वेग अत्यंत जास्त होता आणि रस्त्यावर वाहनं नियंत्रणाबाहेर धावत असल्याची स्थानिकांची तक्रार नेहमीचीच आहे.
अपघाताची माहिती मिळताच भेंडखळ आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संतापलेल्या नागरिकांनी ट्रेलर चालकाला रोखून धरत वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि वाहतूक रोखत प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. रस्त्यावरील वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण पूर्वीपासूनच आहे.
घटनेची माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृत अमोल ठाकूर हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अचानक झालेले हे निधन गावासाठी मोठा धक्का ठरले आहे. या अपघाताचा पुढील तपास उरण पोलिसांनी सुरू केला आहे. प्रशासनाने संबंधित रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.




