ठाकरेंनी एक जागा मागितली, मित्रपक्षाचा नकार; अखेर स्वबळावर उतरत १०० टक्के स्ट्राईक रेट मारला, पालकर दाम्पत्य चर्चेत…

SHARE:

रायगड : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मोठा धक्का देत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाने केवळ एक जागा मागितली होती, परंतु शेतकरी कामगार पक्षाने एकही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून उभे राहिलेल्या पालकर दाम्पत्याने दणदणीत विजय मिळवला. उमेदवार संदीप पालकर आणि त्यांची पत्नी श्वेता पालकर यांनी अलिबागच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

विशेष म्हणजे ठाकरेसेनेने या निवडणुकीत केवळ दोन उमेदवार उभे केले होते, मात्र दोन्ही उमेदवार विजयी ठरल्याने ठाकरेंचा अलिबागमधील स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात स्थान न मिळूनही स्वबळावर उतरत थेट विजय मिळवणं ही ठाकरे गटासाठी मोठी राजकीय कामगिरी मानली जात आहे.

या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पालकर दाम्पत्याच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कोणतेही मोठे नेते, आमदार किंवा खासदार मैदानात उतरलं नव्हतं. पूर्णपणे स्थानिक संघटन, कार्यकर्त्यांची मेहनत आणि नागरिकांशी थेट संवाद यांच्या बळावर हा विजय साकारण्यात आला. त्यामुळे हा विजय ग्राऊण्ड लेव्हल राजकारणाचं उत्तम उदाहरण मानलं जात आहे.

आजच्या निकालामुळे अलिबाग नगरपालिका हद्दीत ठाकरेंची मशाल आजही तेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादित संसाधने आणि राजकीय दबाव असतानाही पक्षाने आपली ओळख आणि जनाधार कायम असल्याचे विजयातून दाखवून दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संदीप पालकर यांच्या रुपाने अलिबाग नगरपरिषदेला एक सक्षम, आक्रमक आणि स्पष्टवक्ते विरोधी पक्षनेते मिळणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणे, जनतेचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडणे आणि प्रशासनावर दबाव निर्माण करणे ही भूमिका ते प्रभावीपणे बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकूणच, अलिबाग नगर परिषद निवडणूक ही ठाकरे गटासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली असून, पालकर दाम्पत्याचा दुहेरी विजय अलिबागच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरण्याचा अंदाज आहे.

Leave a Comment

अधिक वाचा