
पाटणा : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या महिलेच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान राहिलेल्या कात्रीमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पीडितेचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व चंपारण जिल्ह्यातील जितना पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी मणिभूषण कुमार यांच्या २५ वर्षीय पत्नी उषा देवी यांचे दीड वर्षांपूर्वी गरोदरपणात सिझेरियन झाले होते. ऑपरेशननंतर महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनीच या महिलेचं सिझेरियन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कुटुंबाने सहमती दर्शवली आणि तिचं ऑपरेशन करण्यात आलं.
ऑपरेशननंतर महिलेला सतत पोटदुखीचा त्रास होत होता. कुटुंबाने अनेकवेळा अल्ट्रासाऊंड केले, परंतु काहीही गंभीर आढळून आले नाही. डॉक्टर नेहमी तिला वेदना कमी करण्यासाठी औषधे लिहून द्यायचे. पण, त्याने फक्त तात्पुरता आराम मिळत असे दिला. तिच्या वेदना कधीही पूर्णपणे कमी झाली नाही.
काही दिवसांपूर्वी तिला अचानक असह्य पोटदुखी होत होती. तेव्हा मृत महिलेच्या कुटुंबाने तिला डॉक्टरकडे नेले. एमआरआय स्कॅन करण्यात आले. जेव्हा त्याचा अहवाल समोर आला, त्याने सर्वांना धक्का बसला. महिलेच्या पोटात चक्क कात्री असल्याचं आढळून आलं. अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यांनी कुटुंबाला असंही सांगितले की विलंब झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, उषा देवीच्या कुटुंबाने तिला रहमानिया रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कुटुंबाने सांगितलं की, ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटातून कात्री काढण्यात आली होती, परंतु त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला. कुटुंबाने आरोप केला आहे की, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच उषा देवी यांचा मृत्यू झाला आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.




