‘बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही’; मुंबईत प्रचाराला आलेल्या भाजपच्या के. अण्णामलाईची मुक्ताफळे…

SHARE:

मुंबई : एकीकडे मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना त्यात आता तामिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या नेत्याने तेल ओतलं आहे. मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी केलं. मुंबईच्या व्यवस्थापनेसाठी योग्य लोक बीएमसीमध्ये बसवावी लागतील असंही अण्णामलाई म्हणाले. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.

के. अण्णामलाई हे तामिळनाडूतील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते मुंबईत प्रचारासाठी आले आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

नेमकं काय म्हणाले अण्णामलाई?
के. अण्णामलाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे ७५  हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे ८  हजार कोटी तर बंगळुरुचे बजेट हे १९  हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावी लागतील.

अण्णा की झण्णा, त्याला अटक करा
के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर आता राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, “अण्णामलाईवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला. भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का?”

संजय राऊत पुढे म्हणाले की,
“अण्णामलाईने १०६  हुतात्म्यांचा अपमान केला आहे. त्याच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काय म्हणणे आहे? फडणवीस म्हणतात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. मग तुमचे नेते असे म्हणतात, स्टार प्रचारक अशी वक्तव्य करतात. अण्णा, फण्णा, झण्णा कुणीही असो, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला महाराष्ट्राबाहेर जाता आलं नाही पाहिजे.”

Leave a Comment

अधिक वाचा