मुंबई – ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर अशा कारणांमुळे राज्यातील महापालिका निवडणुकींना विलंब झाला. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकीय पक्षांना या निवडणुकीचे वेध लागले होते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ही पहिलीच महापालिकेची निवडणूक होणार होती. त्यामुळे भाजप महायुतीचं लोकसभा, विधानसभेनंतर विशेष करुन मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचं मिशन होतं. तर ठाकरे शिवसेनेसमोर महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान होतं. राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबरला २०२६ रोजी एकूण २९ महापालिका निवडणुंकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि राजकीय पक्ष तयारीला लागले.
भाजप महायुतीला काहीही करुन मुंबई महापालिका काबीज करायची होती. त्यामुळे महायुतीने कंबर कसली. तसेच मुंबईतील मराठी मतांचं विभाजन टाळून सत्तेसाठी ठाकरे बंधु एकत्र आले. ठाकरे बंधुंसाठी मुंबई पालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची झाली होती. त्यामुळे मुंबई पालिकेत कुणाचा महापौर बसणार? याकडे राजकीय वर्तुळाची करडी नजर होती. भाजप+शिंदेंच्या महायुतीला मतदारांनी सर्वाधिक जागांवर विजय मिळवून दिलाय. त्यामुळे आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींनाही आनंदाची बातमी मिळणार आहे. महायुतीला स्पष्ट बहुमतानंतर मुंबईतील लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज
महायुतीचा विजय झाल्यास आता मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींना महायुतीचा विजय झाल्यास आता दरमहा १ हजार ५०० रुपयांसह बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
महायुतीची घोषणा काय होती?
महायुतीकडून ११ जानेवारीला वचननामा जाहीर करण्यात आला. महायुतीकडून आरोग्य, शिक्षण,मुलभूत सुविधा आणि युवांना समोर ठेऊन वचननामा तयार करण्यात आला होता. महायुतीने या वचननाम्यात सत्तेत आल्यास नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट बसमध्ये काय बदल करणार? याचं आश्वासन दिलं होत. महायुतीने या वचननाम्यातून महिलांना बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत देणार असल्याचा शब्द दिला होता. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना बेस्ट बसमधून अर्ध्या तिकीटात केव्हापासून प्रवास करायला मिळणार? याची प्रतिक्षा असणार आहे.




