नवी दिल्ली – दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांना गोवल्याबद्दल न्यायालयाने सीबीआयला फटकार लावली. सीबीआयच्या आरोपपत्रात अनेक त्रुटी असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की आरोपपत्रात अंतर्गत बाबी आहेत ज्या कथित कट रचण्याच्या सिद्धांताला कमकुवत करतात. न्यायालयाने असेही म्हटले आहे की केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय गोवण्यात आले. हे कायद्याच्या उल्लंघन आहे, विशेषतः जेव्हा त्यात संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा समावेश असतो. न्यायाधीशांनी म्हटले आहे की कथित कट रचण्यात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचा आरोप कोणत्याही मूलभूत पुराव्याशिवाय खरा ठरू शकत नाही.
न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की हजारो पानांच्या सीबीआयच्या आरोपपत्रात अशी सामग्री आहे जी कोणत्याही साक्षीदारांच्या जबाबांना समर्थन देत नाही. न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की आरोपपत्रात दिशाभूल करणारी विधाने आहेत. मुख्य आरोपी कुलदीप सिंग याला निर्दोष सोडताना न्यायाधीशांनी म्हटले की त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसताना त्याला पहिल्या आरोपी म्हणून का गोवण्यात आले हे आश्चर्यकारक आहे. सिसोदिया यांच्यावर दारू धोरण तयार करण्याचा आणि अंमलात आणण्याचा आरोप होता, परंतु न्यायालयाने म्हटले की त्यांचा सहभाग दर्शविणारा कोणताही पुरावा नाही आणि कोणतीही वसुली झालेली नाही.
न्यायाधीश जितेंद्र सिंग म्हणाले कि कधीकधी जेव्हा तुम्ही खूप फाईल्स वाचता तेव्हा फाईल तुमच्याशी बोलू लागते. न्यायालयाने एजन्सीला फटकारताना म्हटले की मी पहिल्या दिवसापासून कबुलीजबाब मागत आहे, परंतु तो आरोपपत्र देण्यात आला नाही. मी स्टार साक्षीदारांची यादी मागितली होती. या उत्तरात, सीबीआयने सांगितले की ही माहिती सीलबंद लिफाफ्यात देण्यात आली आहे. विशेष न्यायाधीशांनी त्यांना अद्याप कबुलीजबाबाची प्रत देण्यात आली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांना सीबीआय वकिलाकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा होती. परंतू सीबीआयने कट रचण्याचा प्रयत्न केला. अभियोक्त्याचा सिद्धांत केवळ अंदाज आहे.
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, केजरीवाल म्हणाले की सत्याचा विजय झाला आहे. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा राजकीय कट रचला गेला. आम्हाला भ्रष्ट ठरवण्यात आले. आपच्या पाच प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात ओढून सहा महिने ठेवण्यात आले. इतिहासात असे कधीच घडले नाही. आमचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. गेल्या काही वर्षांपासून भाजप दारू घोटाळ्याबद्दल आमच्यावर आरोप करत होती, परंतु आज न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. हा पूर्णपणे बनावट खटला होता. खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात टाकणे पंतप्रधानांना शोभत नाही.
मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रियाही दिली. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले कि सत्यमेव जयते. आज, आम्हाला पुन्हा एकदा बाबा साहेब आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारसरणीचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभिमान वाटतो. मोदींच्या संपूर्ण पक्षाने आणि सर्व एजन्सींनी आम्हाला बेईमान म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी, आज हे सिद्ध झाले आहे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे कट्टर प्रामाणिक आहेत.




