जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ; अधिकारी-‌कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी,निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे प्रतिपादन

SHARE:

अहिल्यानगर – भारतातील जनगणना २०२७ ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून या कामात अचूक माहिती संकलन आणि प्रभावी समन्वय आवश्यक आहे. जनगणना प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय प्रशिक्षणातून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, अशी सूचना जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी केली.

​जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला असून हे प्रशिक्षण दि. ४ मार्च ते ६ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. ​यावेळी जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सागर बागुल, जिल्हा समन्वयक श्रीकांत बनकर, तहसीलदार नागेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

​निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, सन २०११ नंतर ही जनगणना होत असून यावेळेसची जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार आहे. नियुक्त अधिकाऱ्यांनी जनगणनेबाबत शासनाने दिलेल्या नियमावलीचा, सूचनांचा सखोल अभ्यास करावा. सर्वांनी गांभीर्याने प्रशिक्षण पूर्ण करावे. प्रगणकांच्या नियुक्त्या करून त्यांनाही प्रशिक्षित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ​जनगणना संचालनालयाचे उपसंचालक सागर बागुल यांनी प्रशिक्षणामध्ये जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलनाची पद्धत, तांत्रिक बाबी तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

​या प्रशिक्षण सत्रास सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह महानगरपालिका, नगर परिषद, महसूल विभाग, शिक्षण विभाग तसेच विविध शासकीय कार्यालयांतील जनगणना अधिकारी, प्रभारी अधिकारी, प्रभारी लिपिक व तांत्रिक सहायक आदी उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा