
मुंबई – बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
दिग्दर्शकाने उर्मिलाचं कौतुक केलं
राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबत अनेक हिट चित्रपट केले आहेत. एकेकाळी, अभिनेत्री आणि दिग्दर्शकाची ही जोडी प्रचंड हिट झाली. यामुळे उर्मिलाचं नाव राम यांच्यासोबत जोडलं गेलं. दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्या आल्या होत्या, परंतु दोघांनीही नेहमीच या अफवा फेटाळून लावल्या आहेत. आता, झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा उर्मिलासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. उर्मिलाचं कौतुक करताना राम म्हणाले, ‘मला वाटतं की, ती सर्वात चांगली अभिनेत्री आहे, म्हणूनच मी तिच्यासोबत इतक्या चित्रपटांमध्ये काम केलंय. मी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही खूप काम केलंय, पण कोणीही त्याबद्दल बोलत नाही. पण सोशल मीडियावर फक्त आमच्याबद्दल बोलणं आणि अफवा पसरवणं हेच आहे. सोशल मीडिया असंच काम करतं.’
१९९० आणि २००० च्या दशकात राम गोपाल वर्मा यांनी उर्मिला मातोंडकरसोबत अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये ‘रंगीला’, ‘दौर’, ‘सत्या’, आणि ‘प्यार तूने क्या किया’ सारखे चित्रपट समाविष्ट आहेत. या चित्रपटांच्या यशानं राम गोपाल वर्मा यांना केवळ इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवून दिलं नाही तर उर्मिला मातोंडकरलाही खूप मदत केली.





