विधिमंडळात सरकारची कसोटी; उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, कोणते मुद्दे गाजणार?

SHARE:

मुंबई : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याशी संबंधित मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदी, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडको जमीन घोटाळ्याचा कथित आरोप, साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्यांवर होत असलेले आरोप अशा सर्व पार्श्वभूमीवर उद्या, सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील सरकारी जमीन कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. आता अधिवेशनात विरोधी पक्ष अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगावर नाराजी
अवघ्या ४८ तास आधी राज्यातील २४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय, मतदान झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतींची लांबणीवर पडलेली मतमोजणी, मतदार यादीतील गोंधळ, महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रभागनिहाय करण्यात आलेली विभागणी यामुळे टीकेचा धनी बनलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधातील नाराजी अधिवेशनात व्यक्त केली जाऊ शकते.

दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेतेविना
विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाला सध्या विरोधी पूर्वसंध्येला विरोधी पक्ष शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठक होऊन अधिवेशनातील रणनीती निश्चित केली जाते. अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित केले जातील, याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाते. मात्र, आता विरोधी पक्षनेताच नसल्याने विरोधकांच्या बैठकीविषयी उत्सुकता आहे.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ?

नागपूर : मुंबईसह देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली असल्याने या बैठकीला प्रत्यक्षात किती नेते उपस्थित राहू शकतील, हे सांगणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीसुद्धा मागील काही काळातील राजकीय वातावरण पाहता विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर बहिष्कार घातलील असे संकेत मिळत आहेत. ‘आम्हाला शनिवारी सायंकाळी उशीरा चहापानाचे निमंत्रण मिळाले. या निमंत्रणाचा स्वीकार करायचा की नाही, हे घटक पक्षांशी चर्चा करून ठरवू,’ असे विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यात विरोधी पक्षनेता नसल्याने कोणालाही विरोधी पक्षनेत्याचा बंगला आवंटीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची पत्रकार परिषद विधान भवनातील काँग्रेस कार्यालयात होणार असल्याचे समजते.

Leave a Comment

अधिक वाचा