एमपीएससी चा कारभार रामभरोसे! परीक्षा तारखांचा घोळ, निकालाला उशीर; काही अधिकारी ‘नॉट रिचेबल’ तर काही सुटीवर…

SHARE:

मुंबई – राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच २१ डिसेंबर रोजी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणा निकालांमध्ये व्यस्त राहणार असल्याने परीक्षेच्या सुरळीत आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याने आयोगाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

३ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपालिकांसाठी मतदान झाले, तर २० डिसेंबर रोजी काही नगरपरिषदा आणि नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. या दोन्ही टप्प्यांतील मतदानाचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. याच दिवशी MPSC ची गट ‘ब’ पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा निकालांमध्ये व्यस्त राहणार असल्याने परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परीक्षार्थींमध्ये नाराजी –
एमपीएससी ने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. मात्र, आयोगाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजी पसरली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, आयोगाच्या या दिरंगाईमुळे उमेदवारांनी आयोगाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘एमपीएससी’च्या कारभारावर नाराजी –
यापूर्वीही एमपीएससी ने परीक्षा काही दिवसांवर असताना परीक्षा पुढे ढकलल्याची उदाहरणे आहेत. जर परीक्षेच्या नियोजनात कोणतीही अडचण येत असेल, तर आयोगाने त्वरित आढावा घेऊन परीक्षार्थींना माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, आयोगातील अधिकारी याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ ने एमपीएससी चे अध्यक्ष रजनीश सेठ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सुटीवर असल्याने आयोगाचा कारभार कोण पाहत आहे, निर्णय कोण घेत आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

विद्यार्थ्यांची मागणी –
निवडणूक निकालामुळे परीक्षेवर परिणाम होणार नसेल, तर आयोगाने २१ तारखेलाच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट परिपत्रक काढावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. अनेक विद्यार्थी वर्षांनुवर्षे या परीक्षांचा अभ्यास करतात. आयोगाच्या अशा अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गेल्या काही वर्षांतील एमपीएससी च्या कारभाराकडे पाहता, परीक्षार्थी कार्यक्षम अधिकारी आयोगात नेमण्याची मागणी करत आहेत. आयोगाने आयोजित केलेल्या अनेक परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत आणि त्याबद्दल कोणतीही स्पष्टता नसते, याबद्दलही परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे.

परीक्षेसाठी कसरत –
राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये, जसे की सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. या ठिकाणी नगरपालिका असल्यामुळे निकाल प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाने लवकरात लवकर याबद्दल निर्णय कळवावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा