भांडण सोडवायला गेल्यानंतर कॉलर पकडली, मुंबईच्या कांदिवलीत गुंडांची पोलिसांना मारहाण…

SHARE:

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या ज्या घटना समोर येत आहेत, त्यामधून त्यांना पोलिसांचं भय नसल्याचं दिसून येत होतं, मात्र आता तर गुन्हेगारांची हद्दच झाली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर काही स्थानिक गुंडांनी थेट हल्ला चढवून त्यांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती, याच हाणामारीला सोडवण्यासाठी आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या टोळीकडून हल्ला करण्यात आला. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत.या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. मात्र, यावेळी स्थानिक गुंडांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी उलट पोलिसांवरच हल्ला केला.

या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले असून यामध्ये काही गुंड पोलिसांना अडवताना आणि, त्यांच्याशी वाद घालताना, त्यांच्यावर हात उचलताना दिसून येत आहेत. यावेळी काही गुडांनी तर पोलिसांची कॉलर पकडल्याचं दिसून येत आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारातून स्थानिक गुंडांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

या घटनेनंतर कांदिवली पोलीसांनी ॲक्शन घेतली आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी त्वरित मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच, अतिरिक्त पोलीस फौजफाटा बोलावून एकता नगर आणि आसपासच्या भागामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली असून हल्ल्यात सहभागी असलेल्या मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा