
मुंबई : भारताची पहिली बुलेट ट्रेन केंव्हा सुरू होणार याची देशवासियांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे संचालन टप्प्याटप्प्याने केले जाईल.
सर्वप्रथम सुरत-बिलिमोरा हा विभाग सुरू केला जाईल. त्यानंतर वापी-सुरत, वापी-अहमदाबाद, ठाणे-अहमदाबाद असे टप्पे सुरू होतील आणि अखेरीस संपूर्ण मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर कार्यान्वित केला जाईल.
देशातील बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेनबाबत अखेर मोठे अपडेट समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या टाइमलाईन आणि टप्प्याटप्प्याने होणाऱ्या सुरुवातीबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्णपणे तयार होईल आणि त्यानंतर ती प्रवाशांसाठी सुरू केली जाईल.
रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बुलेट ट्रेनचे संचालन एकाच वेळी संपूर्ण मार्गावर सुरू केले जाणार नाही, तर ते टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. यामुळे तांत्रिक चाचण्या, सुरक्षा मानके आणि प्रवाशांच्या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित करता येतील.
सर्वप्रथम सुरत ते बिलिमोरा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा दरम्यान सुरू केला जाईल. त्यानंतर अनुक्रमे वापी ते सुरत, वापी ते अहमदाबाद, आणि पुढे ठाणे ते अहमदाबाद या मार्गावर हाय-स्पीड ट्रेन सुरू केली जाईल. अंतिम टप्प्यात मुंबई ते अहमदाबाद या संपूर्ण कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनचे संचालन सुरू होईल.
प्रवाशांना होणार फायदा
बुलेट ट्रेनमुळे प्रवास केवळ जलदच होणार नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही तो अधिक चांगला मानला जात आहे. अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, आरामदायी डबे आणि आधुनिक सुविधा ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेनंतर बुलेट ट्रेनब्बाबत लोकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष २०२७ कडे लागले आहे, जेव्हा देशाला पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनचे स्वागत करता येणार आहे.




