
पिंपरी-चिंचवड – पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा उघड झाला आहे, तर पुण्यातील निगडी येथील डेक्कन असोसिएशनची जमीन, संस्थेच्या विश्वस्तांनी विकल्याचा आरोप,माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. अजित पवार यांची शिवाजीनगरमध्ये ज्या इमारतीमध्ये पत्रकार परिषद झाली. त्या इमारतीसंदर्भात विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. पार्थ पवारांशी पुण्यात निगडीत जमिनीचा आणखी एक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विजय कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यातील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही १९३६ साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या अर्ध्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उभे आहे. धर्मादाय आयुक्तांनी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेला त्यांची जागा भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र संस्थेच्या विश्वस्तांनी ती जागा विकली, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शिवाजीनगरमध्ये ज्या इमारतीमध्ये पत्रकार परिषद झाली, त्याच इमारतीसंदर्भात विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची, जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली. हा साहिल प्रधान तोच आहे, जो मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात, अमेडिया कंपनी आणि शितल तेजवानी यांच्यात जो करार झाला. त्या व्यवहारांत साहिल प्रधान हा साक्षिदार आहे. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र, पार्थ पवार यांचा या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. असे विजय कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन मासहिती दिली आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीने ही जागा विकसित केली आहे. तसेच कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार या , इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत, असेही विजय कुंभार यांनी सांगितले आहे. सदर जागा ६० वर्षांच्या भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या जागी विकसित करुन विकण्यात आली. २०१७ पासून या जमिनीची विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असे म्हणत राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार देखील यामध्ये सहभागी आहेत. कारण ते कारवाई करत नाहीत. कारण ते सत्तेत एकत्रित आहेत, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात साखर उद्योगाची पाया भरणी शेठ लालचंद हिराचंद आणि वालचंद हिराचंद यांनी केली. १९३३ साली रावळगाव आणि वालचंद नगर इथे १९३३ साली साखर कारखाने त्यांनी सुरु केली. मात्र हा साखर उद्योग काळाच्या कसोटीवर टिकायचा असेल तर, साखर उद्योगातील नव नवीन तंत्रज्ञान देखील या उद्योगाने आत्मसात करायला हवे ,हे दूरदृष्टी असलेल्या लालचंद हिराचंद यांनी ओळखले. त्याकाळी साखर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान ब्रिटिश आणि युरोपियन देशांकडे होते. त्या तंत्रज्ञान आणि संशोधनात भारत स्वावलंबी झाला पाहिजे, हे ओळखून लालचंद हिराचंद यांनी पुण्यातील शिवाजी नगर भागात १९३६ मध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी
असोसिएशनची स्थापना केली. जिथे पुण्यातील शिवाजी नगर बस स्थानक होते. आणि जिथे आत्ता शिवाजी नगर मेट्रो स्टेशन आहे तिथली ३० हजार स्क्वेअर फूट जागा या संस्थेच्या मालकीची झाली. त्यापैकी पुढच्या बाजूला असलेल्या जागेवर संस्थेची इमारत उभी राहिली तर, पाठीमागची तेवढीच जागा मोकळी ठेवण्यात आली.
वालचंद हिराचंद हे १९३६ पासून १९५० पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष राहिले. १९६५ साली शिवाजी नगरच्या समोरच्या भागातील, जागेवर संस्थेकडून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ज्याचे उदघाटन त्यावेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर या संस्थेकडून पाठीमागच्या मोकळया जागेत २०११ मध्ये आणखी एक इमारत बांधण्यात आली, ज्याचे उदघाटन त्यावेळचे कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. महाराष्ट्र , गुजरात आणि कर्नाटकमध्ये संस्थेच्या शाखा आहेत. साखर उदयोगाबद्दलच शास्त्रीय आणि तांत्रिक ज्ञान वाढीस लागावे हा संस्थेचा मूलभूत उद्देश आहे. संस्थेचे २२०० सदस्य आहेत. संस्थेतून चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू ,३५ डॉक्टर्स आणि १४०० पेक्षा अधिक पदवीधारक तयार केलेत. संस्थेला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही तर सदस्यांकडून होणारी मदत , जाहिरात आणि इतर मार्गाने संस्थेला अर्थपुरवठा होतो. सध्या एस बी भांड हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर रोहन शिरगावकर हे उपाध्यक्ष आहेत. तर एम.के. पटेल हे गुजरातमधून उपाध्यक्ष आहेत.
डेक्कन शुगर टेक्नॉंलॉनाजीची ही जागा मिळवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले. आधी डीएसटीए च्या विश्वस्तांकडून कल्पवृक्ष या कंपनीला समोरच्या बाजूला असलेल्या ३० हजार स्क्वेअर मीटर पैकी १५ हजार स्क्वेअर मीटर जागा ६० वर्षांच्या भाडेकराराने धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने देण्यात आली. संस्था आर्थिक अडचणीत असल्याने हा व्यवहार केल्याचे आणि संस्थेला त्यातून काही कोटी रुपये मिळाल्याचं सांगण्यात आले. धर्मादाय आयुक्तांचा आदेश भाड्याने देण्याचा म्हणजे लीज डिडचा होता. प्रत्यक्षात मात्र संस्थेने ती जागा कल्पवृक्ष कंपनीला विकण्यात आली. कल्पवृक्ष कंपानीने तिथे १३ माजली इमारत उभारली. ६३ हजार स्क्वेअर फूट कमर्शियल जागा त्याठिकाणी निर्माण झाली. बांधकामासाठी चार एफएसआय भेटला. त्यापैकी खालच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे तर वरचे मजले कमर्शियल रेटने विकण्यात आले. पार्थ पवार यांची अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात करार होऊन अमेडीया कंपनीला तेजवणीकडून पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्या व्यवहारामध्ये साहिल प्रधान हा साक्षीदार आहे. तशी नोंद व्यवहारांच्या कागदपत्रांमध्ये आहे. त्याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर टेक्नालॉजी कडून कल्पवृक्ष या कंपनीबरोबर व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात आली.




