शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर, तुम्हाला फायदा होणार का ? जाणून घ्या…

SHARE:

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा तुम्हाला फायदा होणार का? कोणते शेतकरी आहेत या योजनेसाठी पात्र?

गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या कर्जमाफी योजनेतंर्गत दोन लाखांपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा कोणत्या शेतकर्‍यांना फायदा होणार? तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार का? काय आहेत या योजनेचे निकष?

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २  लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

२  लाखा रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल

पीक कर्ज थकलेल्या अशा शेतकऱ्यांना पात्र असतील

३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंतचे थकीत कर्ज माफ होईल

तर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त ५० हजार रुपयांपर्यत लाभ

सांगलीतील २  लाख १० हजार शेतकऱ्यांना लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांनी ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ९०% हून अधिक पीक कर्ज वाटपात सांगली जिल्हा बँकेचा वाटा आहे. ३० सप्टेंबर २०२५ अखेर जिल्हा बँकेचे ६१ हजार ७६१ शेतकरी थकीत असून त्यांची थकबाकी एक हजार कोटी २४ लाख इतकी आहे. नियमित कर्जदारांची संख्या एक लाख ४७ हजारावर आहे. तसेच जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना अटी शर्तीच्या आदीन राहून सुमारे १२००  कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता निकषांची प्रतीक्षा आहे. बँकांनी तीन महिन्यापासून माहिती संकलन सुरू होती. ही माहिती शासनाने तयार केलेल्या पोर्टल वर भरण्यात येत आहे.

दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज; “सातबारा कोरा करा”ची जोरदार मागणी

धाराशिव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकर्‍यांची नाराजी दिसून आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी “सातबारा कोरा करावा” अशी मागणी करत सरकारला इशारा दिला आहे. अनेक वेळा शेतकरी जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतो. त्यामुळे तो ‘चालू बाकीदार’ म्हणून नोंदवला जातो आणि कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहतो.

जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार यामुळे चालू बाकी असलेल्या शेतकर्‍यांनाही जास्तीत जास्त अनुदान देऊन दिलासा द्यावा, अन्यथा हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. सर्व शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा