फक्त ३,००० रुपयांसाठी सव्वीस लोकांचा बळी गेला! जर दोन व्यक्तींनी वेगळ्या पद्धतीने वागले असते, तर पहलगाममधील भीषण लढाई टाळता आली असती, पण…

SHARE:

 जम्मू-काश्मीर : २२ एप्रिल २०२५ च्या पहलगाम हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण. या नृशंस दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांनी जीव गमावले. धक्कादायक बाब म्हणजे, दोन स्थानिक रहिवाशांनी केवळ ३००० रुपयांसाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि त्यांना पोलिसांना कळवले नाही, ज्यामुळे हे भीषण हत्याकांड घडले. स्थानिकांच्या विश्वासघातामुळे अनेक जीव वाचवण्याची संधी गमावली.

२२ एप्रिल २०२५ … भारताच्या इतिहासतला एक काळा दिवस म्हणून हा सर्वांच्या लक्षात आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या असंख्य पर्यटकांसाठी आणि सर्व भारतीयांसाठी हा दिवस अतिशय हादरवणारा आणि मन सुन्न करणारा होता. २२ एप्रिलला दुपारच्या सुमारास पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हल्ल्यात, गोळीबारात तब्बल २६ नागरिकांनी जीव गमावला. २६ पुरूषांना, हो, फक्त पुरूषांना, त्यांच्याच घरच्यांसमोर. धर्म विचारून, गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. आई, पत्नी, मुलगी यांच्यासमोर त्या लोकांनी प्राण गमावले. त्यावेळी अंगला सुटलेला कापरा अजूनही गेला नसेल, ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही सुकले नसतील. आज २२ एप्रिल २०२६. त्या दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.

या प्रकरणाच्या तपासदरम्यान एक धक्कादायक आणि हादरवणारं वळण आलं. हल्ल्याच्या तपासादरम्यान असं उघड झालं होतं की, तेथील दोन स्थानिक काश्मिरी रहिवाशांनी पोलिसांना वेळेवरच दहशतवाद्यांची माहिती दिली असती, तर हे भीषण हत्याकांड टाळता आलं असतं.

काही पैशांसाठी दहशतवाद्यांना दिला आसरा

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन स्थानिकांची ओळख परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोथाद अशी पटली. तपासात असं उघड झालं की , या दोघांनी केवळ 3 हजार रुपयांच्या मोबदल्यात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि मदतही केली होती. हल्ल्याच्या आदल्या रात्री, म्हणजेच 21 एप्रिलरोजी, पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे ते तीन दहशतवादी या लोकांच्या घरी आले होते. त्यांनी तिथे अंदाजे पाच तास घालवले आणि जेवणही केले.

त्यांच्या संभाषणादरम्यान, ते दहशतवादी पाकिस्तानी उच्चारांसह उर्दू-पंजाबी मिश्रित भाषा बोलत होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आणि ते “अली भाई” नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत होते. खरं म्हणजे, अली भाई हा साजिद जट्ट आहे, जो लश्कर-ए-तोयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) चा एक वरिष्ठ कमांडर आणि मुख्य आरोपी असून तो पाकिस्तानच्या कसूरचा रहिवासी आहे अशी माहिती समोर आली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दहशतवादी 21 एप्रिलच्या रात्री, साडेदहाच्या सुमारास ते दहशतवादी निघून गेले. त्यांनी सोबत काही खाद्यपदार्थ, स्वयंपाकाची भांडी, ब्लँकेट्स आणि एक ताडपत्री देखील नेल्याची माहिची समोर आली होती. या सर्व संशयास्पद हालचाली दिसूनही, त्या दहशतवाद्यांची शस्त्र, परवेझ आणि बशीर गप्प राहिले.

हल्ल्याच्या दिवशी दहशतवाद्यांना पाहिलं, तरीही राहिले गप्प

एवढंच नव्हे तर ज्या दिवशी पहलगाममध्ये हल्ला झाला, ( २२ एप्रिल २०२५ ) , त्या दिवशी दुपारी १२:३० च्या सुमारास , म्हणजेच ते नृशंस हत्याकांड सुरू होण्याच्या काही वेळ आधीच, परवेझ आणि बशीर यांनी, ते तीन दहशवादी बैसरन येथे लपल्याचं पाहिलं होतं. फैसल जट्ट उर्फ ​​सुलेमान शाह, हबीब ताहीर उर्फ ​​जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी नंतर या दहशतवाद्यांची ओळख पटली.

पहलगामच्या परिसरात एक मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे हे स्पष्ट दिसत होते. हे लक्षात आल्यावर परवेज आणि बशीर यांनी तात्काळ पोलिसांना किंवा स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेला माहिती दिली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते. पण त्यांनी तसे न काहीही न करता गप्प राहण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या घोड्यांसह (टट्टूंसह) मागे हटले आणि आपल्या पर्यटक ग्राहकांच्या परत येण्याची वाट पाहू लागले. दुपारी १.००ते १.३० च्या दरम्यान, त्यांनी पर्यटकांना घोड्यांवरून सुरक्षितपणे पहलगामला परत पोहोचवलं.

हल्ल्याच्या वर्षपूर्तीनंतर पहलगाममध्ये आर्मीचा कडेकोट पहारा; श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल

या हल्ल्याला १ वर्ष पूर्ण झालं असून पहलगाम परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आर्मी आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अलीकडील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सखोल तपासणी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांकडून पर्यटकांची व स्थानिकांची ओळख तपासणी काटेकोरपणे केली जात आहे.

सुरक्षा दलांनी पहलगाममधील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत असून संशयास्पद वस्तू किंवा हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. रस्त्यांवर अतिरिक्त नाके बंदी लावण्यात आली असून वाहनांची तपासणीही करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पहलगाममधील काही प्रमुख पर्यटन स्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.

प्रशासनाने पर्यटकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आर्मी आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा