खंडवा – मध्य प्रदेशातील खांडवा येथे वनविभागाच्या जमिनीच्या जप्तीदरम्यान मोठा गदारोळ झाला. आदिवासींनी दावा केला की ते चार पिढ्यांपासून या जमीनीवर शेती करत आहेत, परंतु त्यांना विनाकारण हटवले जात आहे. याचदरम्यान, वन अधिकारी आणि आदिवासी आमनेसामने आले. या तणावाच्या वातावरणात, वन अधिकाऱ्याने आदिवासींना उघड धमकी दिली. ते म्हणाले कि मला सहकार्य करा, अन्यथा तुमची कबर इथेच खोदून काढेन. संपूर्ण गाव बघत राहील, त्यामुळे मी सांगेन तसे करा.
ही घटना मंधाता विधानसभा मतदारसंघातील नरलाई गावात घडली. बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी एक प्रशासकीय पथक येथे आले होते. गावालगतची सुमारे २३ एकर महसुली जमीन चार वर्षांपूर्वी वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आली होती. हस्तांतरणासंदर्भातील पत्रव्यवहारानंतर, ते जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता त्यांना तेथे १५ ते २० कुटुंबे बऱ्याच काळापासून राहत असल्याचे आढळून आले. हे लोक ८५ एकर सरकारी जमिनीवर शेती करत आले आहेत. वन विभागाने महसूल अधिकाऱ्यांसमोर अतिक्रमण हटवण्याची अट ठेवली. या कारवाईसाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी, आदिवासी आणि वन अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले. आदिवासी म्हणाले कि आम्ही गेल्या 80 वर्षांपासून येथे शेती करत आहोत.
भैयालाल, ओमप्रकाश, पंचम, जोगिया, अजय बारे आणि अरुण या भिल आदिवासी कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की ही जमीन पूर्वी महसूल विभागाची होती, पण आता वन विभाग त्यावर आपला हक्क सांगत आहे. चार पिढ्यांपासून या जमिनी आमच्या ताब्यात आहोत. आम्ही गेल्या ८० वर्षांपासून येथे राहत आहोत आणि शेती करत आहोत.
आमचे कोणाशीही वाद नाहीत, तसेच गावकऱ्यांचाही आम्हाला विरोध नाही. ही जमीन पडीक होती, त्यावर एकही झाड लावलेले नव्हते. आम्ही तिचे शेतात रूपांतर करून सिंचन केले होते. आता वन विभाग, महसूल अधिकारी आणि पोलीस आले आहेत. त्यांनी अवघ्या चार तासांत आमची वस्ती जमीनदोस्त केली.
अतिक्रमणाच्या कारवाईचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात, खंडवा वन विभागाचे रेंजर शंकर सिंग चौहान आदिवासींना असे म्हणताना दिसत आहेत कि मूर्खपणा करू नका. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला तर घ्या, नाहीतर मी तुमची कबर इथेच खोदेन आणि गावकरी फक्त बघत राहतील. या कारवाईवेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पटवारी आणि मोठ्या संख्येने वन अधिकारी उपस्थित होते. जेसीबीच्या साहाय्याने दहा झोपड्या पाडून जमिनीवर चर खोदण्यात आले.
कबर खोदण्याबाबत रेंजर शंकर सिंग चौहान म्हणाले की तिथे दोन मुले गोंधळ घालत होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि एका महिलेने अधिकाऱ्यासमोर अश्लील भाषा वापरली. आम्ही त्यांना समजावून सांगितले की जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, म्हणून आम्ही ते हटवत आहोत. आम्ही सहकार्याची मागणी केली, त्याचवेळी, एक मुलगा दगड घेऊन त्यांच्या दिशेने धावत आला. रागाने भरात हे शब्द निघून गेले. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे प्रशासन आणि वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी २३ एकर जमीन वन विभागाला सुपूर्द करण्यात आली होती, ज्याचा ताबा घेण्यासाठी आता वन विभागाचे पथक आले. या कारवाईदरम्यान गावात मोठा गदारोळ झाला आणि परिस्थिती काही काळासाठी नियंत्रणाबाहेर गेली. जमीन घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे वन विभाग आणि प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी स्थानिकच नाही तर उच्च पातळीवरही तीव्र झाली आहे.





