मुंबई : उद्धव ठाकरे हे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एका ट्वीटने हा गौप्यस्फोट केला आहे. त्यावरून राजकारणात मोठी भूकंप होणार का, याची चर्चा रंगली आहे. काय आहे या भेटीमागचं कारण?
विधान परिषद निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटल्याचा दावा करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगाने झाली. एकेकाळच्या या दोन मित्रांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हा सध्या राज्यात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही नेत्यांमधील बेबनाव आणि युती तोडल्याचे शल्यही वारंवार दिसले. तर या महिन्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या समारोपाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी जोरदार शेरोशायरी केली आणि एकमेकांना आदरही दाखवला. या दोघांमधील जुगलबंदी ही चर्चेचा विषय ठरली.
त्या ट्विटचा दावा काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने एक ट्विट केले आहे. त्यात सूत्रांच्या माहिती आधारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी मध्यरात्री भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या भेटीचा तपशील मात्र समोर येऊ शकला नाही. राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून अनेक मतप्रवाह समोर येत आहे. उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होऊ इच्छित नसल्याचे म्हटले जात असतानाच आता या भेटीने मोठा ट्विस्ट आणला आहे.





