लोकसभेत ‘वंदे मातरम’ वर १० तास चर्चा, गायक विशाल ददलानी नेत्यांवर संतापला; नेटीझन्सने समाचार घेतला…

SHARE:

नवी दिल्ली – भारताचं राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ च्या 150व्या वर्षानिमित्त लोकसभेत तब्बल १० तास चर्चा झाली. या चर्चेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना गायक आणि संगीतकार विशाल ददलानी ने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून सरकारवर थेट टीका केली. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेत झालेल्या विस्तृत चर्चेनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा आवाज बनला’ असे म्हटले होते. त्यांनी १९३७  मध्ये या गीतात बदल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसवर करताच वाद आणखी चिघळला आणि अखेर सभागृहात १०  तासांचा दीर्घ वादविवाद झाला. यावरून संगीतकार विशाल दादलानी याने उपहासाने नेत्यांवर संतापल्याचं दिसलं.

काय म्हणाला विशाल दादलानी?

यावर प्रतिक्रिया देताना विशाल ददलानीने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलाय. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “हॅलो भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे… १० तास ‘वंदे मातरम’ वर चर्चा केली.” यानंतर विशालने उपहासात्मक शैलीत सरकारवर निशाणा साधत म्हटलं, “या चर्चेमुळे भारताचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला? इंडिगोची समस्या सुटली?. हवेच्या प्रदूषणाची समस्या सुटली आहे?” तो पुढे म्हणाला की, “१०  तास एका कवितेवर चर्चा झाली आहे.” विशालने संसदेत खर्च होणाऱ्या पैशांचा मुद्दाही उपस्थित केला. तो म्हणाला,“संसदेत एका मिनिटाचा खर्च २.५  लाख रुपये आहे. आता तुम्ही हिशोब लावा.” यामुळे इतका मोठा कालावधी एका गीतावर चर्चा करण्यात घालवणं योग्य का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. ‘फॅमिली मॅन’ ची अभिनेत्री श्रेया धनवंतरी यांनी ददलानींच्या पोस्टचे समर्थन करत लिहिले,“मला वाटतं ही खूपच गरजेची चर्चा होती.”

तर काही युजर्सनी चांगलाच हल्ला चढवला. एका युजरने लिहिले “१००  तास चर्चा केली तर भारत तिसऱ्या क्रमांकावरून पुढे जाईल का?” दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली “ही तर वेगळ्याच लेव्हलची रोस्टिंग आहे.”एक यूजर म्हणाला “नको करू लाला, नको करू.”तर काहींनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत म्हटले,“आता तुम्ही देशद्रोही झाला आहात!” यावर एका युजरने ददलानीच्या धाडसाचे कौतुक करत लिहिले,“कुणीतरी तरी बोलायची हिम्मत दाखवली.” लोकसभेत ‘वंदे मातरम’वर झालेल्या १०  तासांच्या चर्चेवरून निर्माण झालेल्या या वादामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा