
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या मुंबईला निघालेल्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्लीतून मुंबईसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण केल्यापासून ४० मिनिटांतच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.
दिल्लीतून मुंबईसाठी निघालेल्या विमानाचा यू-टर्न
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या AI८८७ या विमानाचं उजव्या बाजूचं इंजिन टेक-ऑफ करताना बंद झालं. विमानात ऑईल प्रेशर शून्य झालं होतं. त्यामुळे दिल्लीवरुन टेक-ऑफ केल्यानंतर लगेचच विमानाचं पुन्हा दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. पायलटच्या क्रूने उजव्या इंजिनमध्ये ऑईल प्रेशर कमी झाल्याचं पाहिलं, त्यानंतर विमानाने हवेतच टू-टर्न घेतला आणि मुंबईला न जाता पुन्हा विमान दिल्ली विमानतळावर लँड झालं.
एअर इंडियाच्या या AI८८७ विमानाने आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मुंबईसाठी उड्डाण केलं होतं. पण ६ वाजून ५२ मिनिटांनी पुन्हा विमान दिल्ली विमानतळावर आपत्कालीन स्थितीत लँड झालं. या विमानात एकूण ३३५ प्रवासी होते. आता या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानातून पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऑईल प्रेशर शून्य झालं आणि…
विमानाच्या इंजिनमध्ये ऑईल प्रेशर अर्थात तेलाचा दाब तांत्रिकदृष्ट्या गंभीर मानला जातो. पण या स्थितीत लगेचच अपघात होत नाही. ऑईल प्रेशर कमी झाल्यामुळे इंजिनच्या काही भागांपर्यंत ते पोहोचू शकत नाही. ही स्थिती गंभीर असली, तरी ती त्यावेळी कंट्रोल करण्यासारखी असते. ऑईल प्रेशर शून्यावर आलं असतानाही विमानाचा प्रवास सुरूच ठेवला, तर काही मिनिटांत इंजिन अधिक गरम होतं. अशात परिस्थितीत ते जास्त चालवल्यास त्याचं इंजिन निकामी होऊ शकतं.
एक इंजिन खराब झालं, तरी दुसऱ्या एका इंजिनवर विमान सुरक्षितपणे लँड होऊ शकतं. अशा परिस्थितीत, वैमानिक इंजिनची पॉवर कमी करतात किंवा बंद देखील करतात. त्यानंतर विमान जवळच्या विमानतळावर उतरवलं जातं.
दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासाच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने, एअर इंडिया विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटनेबाबत कारवाई केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत एअर इंडियाकडून सविस्तर रिपोर्ट मागवण्यात आला आहे. शिवाय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.





