
पुणे : पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात शिवसेना भाजप युती होईल असं सांगितलं, त्या दृष्टीने बैठका, चर्चा सुरू झाल्या. मात्र जागावाटपामध्ये दोन्ही पक्षामध्ये तिढा निर्माण होत असल्याने शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी नाराज झाल्याचं दिसून आलं. शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजप देण्यास तयार नसून ज्या जागांवरती कधी शिवसेना किंवा भाजप निवडून आली नाही त्या जागा दिल्या जात असल्याची खदखद शिंदेंच्या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आता भाजप शिवसेनेची युती होईल की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता
रवींद्र धंगेकर यांची जागावाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याचा तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे. जागावाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पक्षात आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकरांनी केली आहे.
पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर…
काल आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनांचा उद्रेक झाला, त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे, फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, या हेतूने काल आमचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले, त्यानंतर उदय सामंत यांना भेटलो, जर पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे, तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी ज्या जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपही निवडून आलं नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही, त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असंही रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
अशा प्रकारची युती करणे घातक…
तर आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमच्या पक्षाचे उमेदवार आम्हीच ठरवणार, तर त्याउलट आमचे उमेदवार पण तेच ठरवणार, जागा देखील तेच ठरवणार, असं असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत, यामध्ये नेत्यांना तोंड द्यावे लागणार आहे, आम्ही काल एकनाथ शिंदेंना सांगितलं आहे, अशा प्रकारची युती करणे घातक आहे, शेवटी जर तुमच्या जागा निवडून येणार नसतील तर, तर तुम्हाला युतीचा फायदा काय आहे, त्यापेक्षा आपण आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे, आपण सांगितल्याप्रमाणे, कालच मी चर्चेतून ऐकले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने शिवसेनेची बोलण्याची तयारी दर्शवली आहे, शेवटी कार्यकर्त्याच्या भावना या ओळखून पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असंही रवींद्र धोंगेकर यांनी म्हटले आहे.





