
बारामती – देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामती येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बारामती येथे पवार कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विद्या प्रतिष्ठानद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ च्या उद्घाटनासाठी गौतम अदानी बारामती येथे आले होते. गौतम अदानी बारामती विमानतळावर आले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावर गौतम अदानी दिसताच अजित पवार हे पुष्पगुच्छ घेऊन पुढे सरसावले. अदानी समोर चालत येत असताना दिसताच अजित पवार यांनी लांबून त्यांना हाक मारली. ‘गौतमभाईSSS वेलकम टू बारामती’, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर गौतम अदानी यांनी अजित पवारांचे आभार मानले. यानंतर अजित पवार आणि गौतम अदानी यांच्यात जुजबी बोलणे झाले. आपण इथूनच थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचे ना, असा प्रश्न अजितदादांनी विचारला. त्यावर गौतम अदानी यांनी होकार दर्शवला. यावेळी गौतम अदानी यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. तेव्हा अजितदादांनी, ‘आपण चौघे एकाच गाडीतून जाऊ, रोहित आपल्यासोबत येईल’, असे अजित पवार यांनी सांगितले. यानंतर हे सर्वजण एकाच गाडीत बसले. ही गाडी आमदार रोहित पवार चालवत होते. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अजित पवार यांनी अत्यंत उत्साहाने केलेल्या अदानींच्या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बारामतीत उभारण्यात आलेल्या ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ या संस्थेसाठी गौतम अदानी यांनी निधी दिला आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला सर्व पवार कुटुंबीय हजर होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या हजर होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना गौतम अदानी यांचा सत्कार करण्यासाठी पुढे केले. बारामतीमधील या सोहळ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जे मेहनत करतात, तेच इतिहास रचतात : गौतम अदानी
काही ठिकाणी अशी असतात, ती जीवनाचे प्रतीक होऊन जातात. त्याचप्रमाणे बारामती एक प्रतीक आहे. मी अनेकदा बारामतीत आलोय. कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था यावर शरद पवारांनी काम केले आहे. त्यांनी राज्याचे मंत्री असताना पक्षापलीकडे जाऊन काम केले. आगामी काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही विद्या प्रतिष्ठान सोबत सामंजस्य करार केला आहे. ही भागीदारी सुरू राहील. इतिहास हा बघणाऱ्यांकडून रचला जात नाही, इतिहास तेच लोक रचतात, जे मेहनत करतात. आजचे युग तुमच्याकडून सामर्थ्य मागते, असे गौतम अदानी यांनी आपल्या भाषणात म्हटले.





