
मुंबई : महामुंबई परिसरातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांत सुमारे ५ लाख ६५ हजार विद्यार्थी अद्याप ‘ अपार आयडी ‘ विना (ऑटोमेटेड परमनण्ट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन) असल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे. या जिल्ह्यांत महापालिका निवडणुकांचा काळ सुरू असल्याने, ऐन निवडणुकीतच हे काम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विभागातील एकूण ३८ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांपैकी ३३ लाख ६ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून, एकत्रित प्रगती ८५.४० टक्के इतकी आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रक्रियेबाहेर राहिल्याने शिक्षण विभागाने शाळास्तरावर विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले आहेत. युडायस आकडेवारीनुसार, मुंबई (शहर व उपनगर) जिल्ह्यात २ लाख ७१ हजार, पालघरमध्ये १ लाख ११ हजार, तर रायगडमध्ये ७४ हजारांहून अधिक विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून दूर आहेत.
निवडणूक काळातच शिक्षकांवर ‘अपार’ भार; ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश
अपार आयडी प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण हा मोठा अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात ५ लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज अपयशी ठरण्यामागे आधार पडताळणी, नाव व जन्मतारीख न जुळणे, तसेच पालकांची संमती न मिळणे ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः बारावीतील विद्यार्थ्यांना अपार आयडी काढणे बंधनकारक असून, अपार आयडीशिवाय सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे निवडणूक काळातच हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ताण शिक्षकांवर वाढल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यासाठी अपार आयडीची संकल्पना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, ३१ जानेवारी २०२६पर्यंत शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण २ कोटी १५ लाख ४५ हजार १९४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यापैकी १ कोटी ८४ लाख २१ हजार २२४ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून, ही संख्या ८५.५० टक्के आहे. तरीही अनेक ठिकाणी अपार आयडी काढण्याची प्रक्रिया अद्याप सुरूही झाली नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी आवश्यक असून, प्रक्रियेत अडचणी आल्यास प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिल्या आहेत.
आधार प्रमाणीकरणाचा अडथळा –
अपार आयडी प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण हा मोठा अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात ५ लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज अपयशी ठरण्यामागे आधार पडताळणी, नाव व जन्मतारीख न जुळणे, तसेच पालकांची संमती न मिळणे ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः बारावीतील विद्यार्थ्यांना अपार आयडी काढणे बंधनकारक असून, अपार आयडीशिवाय सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे निवडणूक काळातच हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ताण शिक्षकांवर वाढल्याचे चित्र आहे.
राज्यातील ‘अपार आयडी’ ची स्थिती –
– एकूण विद्यार्थी नोंदणी :२,१५,४५,१९४
– अपार आयडी तयार : १,८४,२१,२२४
– एकूण प्रगती : ८५.५० टक्के





