बिहार – जातीयवादी चेहरा नागडा करणारी एक धक्कादायक घटना बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून घटना समोर आली आहे. कामाची मजूरी मागितल्यावर सुवर्ण जातीच्या लोकांनी अनु. जातीच्या कुटुंबांवर हल्ला केला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर पीडिताच्या घराची तोडफोड करण्यात आली. या प्ररकणी पीडिताने एससी/एसटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर गावातील आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. ही घटना दरभंगाच्या कुशेश्वरस्थान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरिनगर गावात ३१ जानेवारी रोजी घडली.
वृत्तानुसार, विक्रम पासवान यांचे मोठे भाऊ कैलाश पासवान यांनी २०१५ मध्ये हरिनगर येथील रहिवासी हेमंत झा यांच्या घराचे बांधकाम केले होते. बांधकाम कामाचे अंदाजे अडीच लाख रुपये अद्याप हेमंत झा यांनी दिले नाही. वारंवार विनंती करूनही तो पैसे देण्यास नकार देत होता आणि नेहमीच वाद घालत असे.
कैलास पासवान यांनी जेव्हा बाकी पैशाची मागणी केली तेव्हा हेमंत झा यांच्यासह अनेक जण त्यांच्या घरात घुसले आणि काठ्या आणि रॉडने पासवान कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पुरूष, महिला आणि एका मुलीसह पासवान कुटुंबातील ११ सदस्य जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर आरोपीने पीडित पासवान यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराचे नुकसान झाले.
असा आरोप आहे की ३० जानेवारी रोजी, हेमंत झा यांची बहीण आणि मेहुणे तेथून जात असताना, कैलाश पासवान यांनी त्यांची बाईक थांबवून पैशाची मागणी वादविवाद झाला.त्यानंतर झालेल्या पंचायत बैठकीत तणाव कायम राहिला, ज्यामुळे ३१ तारखेला सुवर्णं जातीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने येऊन पासवान समुदायावर हल्ला केला, दुकाने आणि घरातील वस्तूंची तोडफोड केली.
या प्रकरणी अशर्फी पासवान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गावातील ७० आरोपिंवर आयपीसीच्या विविध कलम आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने सर्व आरोपी गावातून फरार झाले आहे. तर दुसऱ्या बाजूनेही त्यांच्या विरोधकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात बारा जणांना अटक करण्यात आली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून अनु.जातीचे लोक भीतीच्या सावटात जगत आहेत.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की सामान्य जीवन ठप्प झाले आहे. दुकाने बंद आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. हरिनगर गावातील एका महिलेच्या मते, आमच्या गावात यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. आम्ही नेहमीच एकत्र राहत होतो, परंतु अचानक सर्व काही बदलले. संपूर्ण गाव आता तणावात आहे.
पंचायत प्रमुख विमल चंद्र खान यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जर 30 जानेवारी रोजी झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती तर 31 जानेवारी रोजी एवढी मोठी घटना घडली नसती.
दरम्यान, राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष धनंजय कुमार हे डीएमसीएच येथे पोहोचले. त्यांनी हरिनगर गावात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. म्हणाले की काही असामाजिक घटकांनी किरकोळ वाद वाढवून मोठा वाद निर्माण केला, कारण हा वाद केवळ पैशाच्या व्यवहाराचा होता जो संवादाद्वारे सोडवता आला असता.




