खेळ : भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण असून खेळाच्या मैदानावरही ते टेन्शन दिसत असतंच. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघातील सामन्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, पण आता श्रीलंकेत हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार की नाही, याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील या महत्वाच्या सामन्याबाबत एका पाकिस्तानी पत्रकाराने मोठा दावा केला आहे.
टी-२० वर्ल्डकपचा थरार सुरू झाला असून प्रत्येक क्रिकेटप्रेमी चांगलाच उत्सुक आहे. येत्या रविवारी, म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी भारत (India) आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यावर अनिश्चिततेचं सावट घोंगावत होतं. श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान भिडणार की नाही ?टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये त्यांचा सामना होणार की नाही ? असे प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडले असून त्याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर येताना दिसत आहे. पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून अशी खबर येत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य सामना होऊ शकतो. याचाच अर्थ असा की हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या भूमीवर आमनेसामने येऊ शकतात. याबाबत पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी त्यांच्या माजी हँडलवरून महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट टाकली आहे. त्यात असं लिहीण्यात आलं आहे की, १५ फेब्रुवारी रोजी टी-२० वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान संघ भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना श्रीलंकेतील या सामन्याबद्दल माहिती दिली आहे, असं त्यांनी पुढे लिहीलं. त्यामुळेच या मोठ्या सामन्यासाठी सज्ज व्हा , असं आव्हानही त्यांनी क्रिकेटप्रेमींना केलं.
पुढील २४ तासांत मोठी घोषणा
यापूर्वी, ८७ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये आयसीसी प्रतिनिधी आणि पीसीबी यांच्यात चर्चा झाली होती, ज्यामध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. Geo Super अंतर्गत सूत्रांचा हवाला देत असे वृत्त दिलं होतं की, आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यातील बैठक सुमारे पाच तास चालली आणि त्यात एक निष्कर्ष निघाला. पुढील २४ तासांत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
Important 🚨🚨
Pakistan 🇵🇰 will most likely play against India in #icct20worldcup2026 on 15th Feb in Sri Lanka, two informed Pakistan Govt’s top officials told me. Get ready for Big Cricket 🏏 Match, folks.
— Zahid Gishkori (@ZahidGishkori) February 8, 2026
पाक पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर नक्वी करणार घोषणा ?
या बैठकीनंतर पाकिस्तानच्या यू-टर्नची अपेक्षा आहे. यासंदर्भात आज ( सोमवार ९ फेब्रुवारी) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी भारतासोबत सामना खेळण्यास हिरवा कंदील देऊ शकतात. आता काय निर्णय होईल याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.




