एलपीजी गॅस दरवाढीचा भडका, तुमच्या खिशाला कात्री लागणार,युद्धाच्या झळा, ऑटो रिक्षाची भाडेवाढ?

SHARE:

मुंबई : आखाती देशातील युद्धाचा रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. तर प्रवाशांनाही दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शहरातंर्गत प्रवासही महागणार आहे. एलपीजी गॅसवरील ऑटोची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता संपूर्ण जगासह भारतालाही बसला आहे. युद्धाची झळ ग्राहकांना बसली आहे. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. तर तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचवेळी आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. शहरातंर्गत प्रवास आता महागणार आहे.

एलपीजी गॅस दरवाढीचा भडका
आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. एलपीजी गॅसचा दर ६१ रुपयावरुन थेट ७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालक आणि संघटनांनी केली आहे.

नाशिकची तर्रीदार मिसळ महागण्याची शक्यता

नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ बसली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढल्याने मिसळचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक गॅस काल २२०० रूपये तर आज २४०० रुपयांवर पोहचले आहेत. पैसे देऊन देखील गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. दररोज गॅसचे दर वाढत असल्याने हॉटेल चालकांची डोकेदुखी वाढली आहे.

हॉटेलसह लॉजिंग व्यवसायावर परिणाम

अमेरिका-इराण युद्धाचा थेट फटका अध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला बसत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलसह लॉजिंग व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. मागील आठवडा भरापासून आम्हाला सुरळीत गॅस मिळत नाही त्यामुळे आम्हाला लॉजिंगचे किचन बंद ठेवावे लागत आहे. याशिवाय मागील आठवड्यापासून ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे. युद्धामुळे जगासह सोलापुरातील पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. सातत्याने गॅस लागतो मात्र आता गॅसचा तुटवडा जाणवत आहे. तसेच गॅसच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. पूर्वी सतराशे ते आठराशेला मिळणारा गॅस आता तेवीसशे ते चोवीसशेवर गेलाय. तसेच तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला हॉटेल बंद करण्याशिवाय पर्यायी राहिलेला नाही. गॅस सिलेंडर वेळेत मिळत नाही त्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने यात लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा