मनोरंजन : ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांबद्दल रणवीर सिंहची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावरही तिने या चित्रपटांच्या यशाबद्दल कोणत्याच शुभेच्छा दिलेल्या नाहीत.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. याआधी डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जबरदस्त कामगिरी केली होती. जगभरात या चित्रपटाने १३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर आता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर २ ’ने अवघ्या सात दिवसांत जगभरात १००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करतच आहेत, त्याचसोबत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या चित्रपटाची प्रशंसा करणारे पोस्ट लिहित आहेत. रजनीकांत, अल्लू अर्जुन, महेश बाबू, अनुपम खेर, कंगना राणौत, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘धुरंधर २ ’साठी खास पोस्ट लिहित रणवीर आणि टीमची पाठ थोपटली आहे. पण या सर्वांत नेटकऱ्यांचा एकच सवाल आहे की, रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण याबद्दल गप्प का आहे?
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हे दोन्ही चित्रपट रणवीरच्या करिअरमधील सर्वांत मोठे चित्रपट ठरले आहेत. रणवीरला याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. जरी तो बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असला तरी हमजा आणि जसकीरत सिंह रंगीच्या भूमिकांनी त्याला आता वेगळ्या पातळीवर नेऊन पोहोचवलं आहे. प्रिती झिंटा, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, शनाया कपूर, अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर रणवीरचं कौतुक केलं. परंतु दीपिकाने मात्र तिच्या सोशल मीडियावर ‘धुरंधर २ ’साठी कोणतीच पोस्ट लिहिली नाही. असं करणारी फक्त दीपिकाच नाही, तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा आहेत.





