रुपाली चाकणकर यांना अटक होणार आहे का? सुषमा अंधारे यांचा मोठा गौप्यस्फोट काय आहे? त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना भेटून…

SHARE:

पुणे  : अशोक खरात प्रकरणात चोहो बाजूने टीका झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तर खरात प्रकरणात लावण्यात येत असलेले आरोप त्यांनी फेटाळले. तर आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांना अगोदर राज्य महिला आयोगाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. खरात प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले कथित आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तर आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

रुपाली चाकणकर यांना अटक होणार?

पोलिसांच्या सगळ्या तपासाकडे आमचं लक्ष्य आहे. खरातच्या प्रकरणात आम्हा सर्वांना रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची चौकशी व्हावी असे वाटते. यामागची आमची कारणं आम्ही स्पष्ट केलेली आहेत. तर आमच्याकडील इनपूटही आम्ही एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपूते यांना दिलेले आहेत, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. तर त्याचवेळी चाकणकर यांचा राजीनामा ही मागणी आमची नाहीच. तो प्रक्रियेचा भाग झाला. उद्या कदाचित त्यांना अटकच व्हायची असेल, जर पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा अधिक डागाळेल, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

खरात सारख्या माणसाला पोसलं कुणी?

राजीनाम्यासाठी मी आग्रही नव्हते. तर त्यांच्या पक्षांतर्गत उद्रेक अधिक होता. बंड फार होते. पक्षांबाहेरील लोकांचा दबाव होता. महिला लैंगिक शोषण प्रकरणात चाकणकर काय म्हणतायेत की मी दोन वर्षापूर्वी, चार वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आहेत. पण खरातचे हे प्रकरण 16 वर्षांपासून सुरू होते असे समोर येत आहे. 16 वर्षांपासून म्हणजे किती केसेस असतील. हजारो केसेस असतील. चाकणकरांनीच ऑनरेकॉर्ड 12-13 वर्षांपासून खरातच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. मुळात खरात सारख्या माणसाला पोसलं कुणी? खरातला बंदुकीचा परवाना देणारे लोक असतील. त्याच्या ट्रस्टला निधी देणारे लोक असतील. तिथे सातत्याने जाणारे लोक असतील, यांनी मदत केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

आवारे यांची चौकशीची मागणी

दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केलेला आहे. शालेय शिक्षण मंत्री असताना ते एमआयडीसीचीच्या प्रांगणात ते काय करत होते. त्यांच्या सोबत एमआयडीसीचे कर्मचारी आहेत. त्यात एक मनकर्ण आवारे ही एक व्यक्ती आहे. तर ही व्यक्ती जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. खरात याचा जगदंब पतसंस्थेशी आर्थिक व्यवहार आहे. चाकणकर सोबत सुद्धा हीच व्यक्ती दिसते. त्यामुळे या आवारे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली.

या खरातसाठी जी जी लोकं काम करत होती. त्यांची नाव आज वाहिणीवरून सांगता येणार नाही. काही माणसं तपासात साथ देणार नाही. ती अलर्ट होतील. आम्ही तेजस्विनी सातपूते यांना ही नावं दिली आहे. त्यांनी आता तपासून पाहावे. आम्ही याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांच्या लक्षात काही गोष्टी आणून देऊ. या प्रकरणातील काही लोकांची नावं देऊ, असे अंधारे यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Comment

अधिक वाचा