मनोरंजन : बॉलिवूडमधील असा एक निर्माता जो स्वत:चा चित्रपट पाहताना गेला होता झोपी. पण जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा ठरला ब्लॉकबस्टर. पाहण्यासाठी थिएटरबाहेर व्हायची प्रचंड गर्दी.
बॉलिवूडमध्ये प्रत्येक निर्मात्यासाठी त्याचा चित्रपट म्हणजे स्वप्न असतं. त्या स्वप्नाला साकार रूप देण्याचे काम दिग्दर्शक करतो. पण एखादा निर्माता आपल्या चित्रपटाच्या ट्रायलदरम्यानच झोपी गेला तर साधारणतः तो चित्रपट कंटाळवाणा असावा असा अंदाज बांधला जातो. मात्र, १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाबाबत याच्या नेमकं उलट घडलं. ट्रायलमध्ये निर्माता झोपला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला.
जॉनी मेरा नाम हा चित्रपट २० नोव्हेंबर १९७० रोजी प्रदर्शित झाला. दिग्दर्शन विजय आनंद यांनी केले होते. प्रमुख भूमिकेत देव आनंद आणि हेमा मालिनी होत्या. या चित्रपटातील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. विशेषतः पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले हे किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणं आजही अमर मानलं जातं. हे गाणं १६ दरवाजांच्या खास सेटवर चित्रित करण्यात आलं होतं, जे त्या काळात अत्यंत वेगळं आणि आकर्षक मानलं गेलं.
भविष्यवाणीने बदललं नशीब
या चित्रपटाचे निर्माता गुलशन राय होते. विभाजनानंतर १९४७ मध्ये मुंबईत स्थायिक झालेल्या गुलशन राय यांनी सुरुवातीला फिल्म डिस्ट्रीब्युशन व्यवसाय केला होता. निर्माता बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. त्यावर B. R. चोप्रा यांनी त्यांची थट्टा केली. ही गोष्ट मनाला लागल्याने गुलशन राय पंजाबमधील होशियारपूर येथे गेले, जिथे भविष्यवाणी केली जाते. तिथे त्यांना विजय आनंद यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा सल्ला मिळाला.
सुरुवातीला विजय आनंद यांनी चित्रपटासाठी नकार दिला होता. मात्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून ते तयार झाले. त्यांनी 5 लाख रुपयांची फी मागितली पण गुलशन राय यांनी रोख रक्कम देण्याऐवजी आपल्या ‘त्रिमूर्ती फिल्म्स’मध्ये एक-तृतीयांश भागीदारीची ऑफर दिली. भावनिक स्वभावामुळे विजय आनंद यांनी ही ऑफर स्वीकारली.
ट्रायलमध्ये झोपले निर्माता तरी चित्रपट ठरला सुपरहिट
चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ट्रायल शोमध्ये गुलशन राय मधेच झोपून गेले. मात्र इंडस्ट्रीमध्ये अशी चर्चा होती की ज्या चित्रपटाच्या ट्रायलमध्ये ते झोपतात, तो चित्रपट नक्कीच हिट ठरतो. ‘जॉनी मेरा नाम’बाबतही तसंच घडलं. चित्रपट रिलीज होताच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी झाली आणि तो १९७० मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. १ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ४ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तो त्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.




