मुंबई : अजितदादांच्या अपघाती निधनानंतर काल बारामती पोटनिवडणुकीत मतदान झाले. यापूर्वीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महा मताधिक्याने जिंकून येतील आणि नवीन रेकॉर्ड होईल असा दावा करण्यात आला. काल बारामतीत किती झाले मतदान?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक झाली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील उमेदवारी काँग्रेसने मागे घेतली असली तरी २२ उमेदवार त्यांच्याविरोधात होते. मोठ्या पक्षाचा एकही उमेदवार त्यांच्याविरोधात नव्हता. सांगता सभेत सर्वांनीच सुनेत्रा पवार या नवीन महारेकॉर्ड करत निवडणूक जिंकतील. त्यांना सर्वाधिक मतं पडतील असा दावा केला आहे. बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागेल. काल बारामतीमध्ये किती झाले मतदान?
बारामतीत मतदानाचा टक्का किती?
राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काल मतदान झाले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, बारामती पोटनिवडणुकीत ५०% मतदान झाले. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५०.७४% मतदान झाले. आता दोन्ही उमेदवारांचे भाग्य हे मतपेटीत कैद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल आता ४ मे २०२६रोजी जाहीर होईल.
सुनेत्रा पवारांसाठी निवडणूक औपचारिक
माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली निधनाने राज्याला धक्का बसला. त्यांच्यानंतर बारामती पोटनिवणुकीत सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. त्यांचा विजय हा निश्चित मानल्या जातो. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात आला. पण मध्यस्थी आणि इतर प्रयत्नांना यश आले नाही. २२ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली नाही. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार दिला नाही.
सुनेत्रा पवार महा रेकॉर्ड करणार?
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या दोन लाखांपेक्षा अधिक लीडने निवडून येणार असा दावा करण्यात येत आहे. खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने सुनेत्रा पवार निवडून येतील असा दावा केला आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा काकी या अडीच लाख मतांनी निवडून येतील असा दावा केला आहे. त्यामुळे हा देशातील निवडणुकीतील महारेकॉर्ड असेल. पण मतदानाचा टक्का घसरल्याने हा महारेकॉर्ड त्या करतील का, हा फैसला 4 मे रोजी समोर येईल.
सुनेत्रा पवारांची पहिली राजकीय कसोटी;विधान परिषदेसाठी उमेदवार निवडीत कुटुंबनिष्ठेचा निकष
विधान निवडणुकीसाठी परिषदेच्या उमेदवाराची निवड करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे. खासदार पार्थ पवार यांची या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून, उमेदवार निवडीत पवार कुटुंबाशी निष्ठा हा निकष असण्याची शक्यता आहे
पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखविण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. त्यासाठी निष्ठावंतांना प्राधान्य दिल्यास तसा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याची संधी सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे
अनेक जण इच्छुक
सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे आणि उमेश पाटील, तसेच अमोल मिटकरी,सुरेश बिराजदार,माजी आमदार सुनील टिंगरे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नात आहेत. दरम्यान, पुण्यातील उद्योगपती आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्याही नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु आहे. विधानसभेच्या आमदारांमधून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १२ मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे.




