
पुणे : प्रत्येक निवडणुकीत गेली ४०-५० वर्षे ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही, अशा ठिकाणी पक्षप्रवेश करून यश मिळविण्याची भाजपची रणनीती आहे. पक्ष मजबूत झाला, तर सत्ता मिळते. त्यामुळे जिथे ताकद नगण्य तिथेच पक्षप्रवेश होत आहेत’, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी केली. तर केंद्रात पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे विविध राज्यांमध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद हुकलं, असं म्हणता येणार नसल्याचंही तावडे म्हणाले.
विनोद तावडे काय म्हणाले?
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर विनोद तावडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत नाही, त्या ठिकाणी इतर पक्षांतील माणसे भाजपकडून घेतली जातात. पक्ष मजबूत करण्यासाठी हे गरजेचे असून, त्यामुळे सत्ता प्राप्त होते. राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास वेगाने होऊ शकतो, अशी मतदारांमध्ये एक भावना असते. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यशाची खात्री आहे.’ असे विनोद तावडे म्हणाले.
शहांसोबतही विरोधी पक्षांचे उत्तम संबंध
‘नुकतेच संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांनी एकत्रित चहापान घेतले. केवळ मोदीद्वेषातून विरोधी पक्ष सक्षम कामगिरी करू शकत नाही. केवळ नितीन गडकरी नव्हे, तर मोदी, शहांसोबतदेखील विरोधी पक्षांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता हे पद काँग्रेसने गांभीर्याने घ्यायला हवे,’ असे तावडे यांनी सांगितले.
…म्हणून नितीन नबीन कार्याध्यक्षपदी
‘केंद्रात पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी माझ्यावर आहे. या निमित्ताने विविध राज्यांमध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद हुकले, असे म्हणता येणार नाही. बिहारच्या नितीन नबीन यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर त्यांना इतकी मोठी जबाबदारी दिल्याचा मला आनंद आहे,’ असे विनोद तावडे यांनी सांगितले.





