
मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते हे महाराष्ट्राचे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून ३ जानेवारीला सूत्रे हातात घेतील. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेला वाढीव २ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांची जागा दाते घेतील.
रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचा पदावधी ३ जानेवारी २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. त्यास अनुलक्षून, संघ लोकसेवा आयोगाच्या समितीने शिफारस केल्यानुसार सदानंद वसंत दाते यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
सदानंद दाते हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केली होती. सदानंद दाते यांच्याकडे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रमुखपदी होते.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. पोलीस सेवेत जवळपास ३२ वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे सदानंत दाते यांच्या तपासातून समोर आले. यानिमित्ताने पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा त्यांनी पुन्हा टराटरा फाडला.
– सदानंद दाते हे १९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहे.
– दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.
– अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित.
– दाते हे डिसेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार असल्यानं त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार.
– दाते यांनी मुंबई पोलिस दलात गुन्हे शाखा तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली होती.
– राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते.
– तेथे असतानाच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली.
– अल्पावधीतच ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख बनले.
– दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू होता.
– याशिवाय मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त, छत्तीसगढ येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे पदही त्यांनी भूषविले.
– त्याआधी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे विभागात ते अधीक्षक होते.
– तेथेच त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळाली.
– त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली.
– त्याच काळात २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते.
– त्यात ते जखमीही झाले होते.
– त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘फोर्सवन’ची जबाबदारी त्यांनी स्वत:हून मागून घेतली.
– फोर्सवनचे ते पहिले प्रमुख होते.
– मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.





