
कटक – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून हार्दिक पांड्याने जबरदस्त अर्धशतक ठोकले. ज्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १७५ धावा केल्या. प्रत्युत्तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ १२.३ षटकात ७४ धावांतच गारद झाला. पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव केला.
कटक येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय फलंदाजीची सुरुवात निराशाजनक झाली. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे तिघेही स्वस्तात तंबूला परतले, ज्यामुळे भारतीय टॉप ऑर्डर ढेपाळली. पण अशा कठीण परिस्थितीत हार्दिक पांड्याने जबाबदारी स्वीकारत एकहाती लढत भारताचा डाव सावरला. सुरुवातीपासून दबावाखाली असतानाही त्याने तडाखेबाज अर्धशतक झळकावले. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्याने भारतीय डावाला गती मिळवून दिली.
हार्दिक पांड्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने १७६ धावांचे लढाऊ लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे. हार्दिकने केवळ २८ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा ठोकल्या. हार्दिक पांड्याशिवाय भारताच्या इतर फलंदाजांकडून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. तिलक वर्मा २६, अक्षर पटेल २३, अभिषेक शर्मा १७, तर कर्णधार सूर्यकुमार यादव याने १२ धावा केल्या. शिवम दुबे आणि जितेश शर्माने प्रत्येकी १० धावा केल्या. जितेश शेवटपर्यंत नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने तीन विकेट्स घेतल्या. तर लुथो सिपाम्ला याने दोन विकेट घेतल्या, तर डोनोवान फरेराच्या खात्यात एक बळी जमा झाला.





