
ठाणे : आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रदेश स्तरावर जो निर्णय होईल, तो अंतिम असेल, असे मत ठाणे भाजप निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. सोमवारी भाजप कोअर कमिटीची बैठक भाजपच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयात पार पडली. त्यावेळी डावखरे यांनी ठाण्यातील शिवसेना – भाजप युतीबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ठाण्याच्या प्रत्येक प्रभागांतील इच्छुक उमेदवारांमधील दोन ते तीन नावे निश्चित करण्यात आली. या उमेदवारांची नावे दोन दिवसांत प्रदेश पातळीवर वरिष्ठांना कळवण्यात येतील, अशी माहिती डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत आमची अतिशय सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यांच्या प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी चर्चा देखील झाली आहे. आता त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला कळवणे अपेक्षित आहे, असे डावखरे यांनी नमूद केले. या बैठकीला भाजप आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माधवी नाईक, संजय वाघुले उपस्थित होते.
ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा स्वबळाचा नारा
केंद्र व राज्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना – भाजपच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे स्वबळावर लढायची वेळ आली. तर आम्ही त्याबाबत पूर्ण तयारी केल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी ठाण्यात दिला.
ठाणे महापालिका निवडणुका जाहीर होताच भाजपच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयामध्ये शिवसेना – भाजप युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना बैठकीचे निमंत्रण नव्हते. राष्ट्रवादी निवडणूक लढवण्याची ताकद ठेवतो. आम्हाला युतीच्या चर्चेला बोलतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू, असे मत पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८० हून अधिक इच्छुक उमेदवारांची मुलाखत देखील घेतली आहे.
राष्ट्रवादी स्वतंत्रपणे १३१ जागांसाठी रिंगणात
आम्हाला महापालिका निवडणुकीत शिवसेना – भाजपच्या माध्यमातून सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या. तर महायुतीमधून निवडणूक लढवणार, मात्र सन्मानपूर्वक जागावाटप झाले नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे १३१ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरेल, असेही परांजपे यांनी नमूद केले.





