मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अव्वल क्रमांक पटकावला. भाजपकडे ८९ नगरसेवकांचं संख्याबळ असल्याने पक्षासाठी मुंबईत महापौरपद मिळवण्याचा रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र जेमतेम एक तृतीयांश, अर्थात २९ नगरसेवक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला जेरीस आणण्याची खेळी केली आहे. महापौरपदासाठी शिंदेसेना अडून बसल्याची माहिती आहे. स्पष्ट बहुमताअभावी भाजपचीही कोंडी झाली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या दोस्ताशी बोलणी केल्याची चर्चा रंगली आहे.
एकीकडे मुंबई महापौरपदाची शर्यत रंगली असताना, कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. मुंबईत महापौर निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना असल्याची माहिती आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना ही ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करत आहे. याला उत्तर म्हणून मुंबईत ठाकरेसेना या हालचाली करत असल्याची चर्चा आहे.
मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीला ११८ जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे ८९ सदस्य आहेत, बहुमताचा आकडा ११४ असला, तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे शिंदेंच्या २९ नगरसेवकांचा भाव वाढला आहे. शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौरपद किंवा स्थायी, बेस्टसारख्या महत्त्वाच्या समित्यांसाठी अडून बसल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांच्या फोडाफोडींमुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्लॅन?
मुंबईत महापौर निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.
मुंबईत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या १२ नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचे बोलले जाते. ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीने बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचा थेट फायदा ठाकरेसेनेला नसला, तरी शिंदेंना महापौरपदापासून दूर ठेवल्याचे समाधान आहे.





