मुंबई – महापालिकेत अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढणारे पक्ष सत्तेसाठी अथवा भाजपविरोधात एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. मिरा-भाईंदरमध्ये भाजपविरुद्ध आम्ही सारे असा नाट्यप्रयोग रंगणार का?
महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली. मित्र पक्षांसह विरोधकांनाही भाजपने अनेक महापालिकांमध्ये अस्मान दाखवले. तर भाजपविरोधात अनेक महापालिकात मित्र पक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. भाजपविरोधात आम्ही सारे असा नाट्यप्रयोग अनेक महापालिकांमध्ये रंगलेला दिसत आहे. चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह अनेक ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठी घाडमोड सुरू आहे. त्यातच मिरा-भाईंदर महापालिकेतही भाजपविरुद्ध आम्ही सारे या प्रयोगाची चर्चा रंगली आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी भाजपला मोठा इशारा सुद्धा दिला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये भाजप विरोधात इतर पक्षांनी मोट बांधली आहे. काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाची या ठिकाणी युती झाली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केल्याने भाजपवर काय परिणाम होतो आणि वरिष्ठ नेते त्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे. राज्यात इतरही ठिकाणी विविध प्रयोग होत असल्याने मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेससोबत युती केल्याने वेगळं काय केलं असा ही सूर काही नेते आळवत आहेत.
आम्ही अंकुश ठेवू
दरम्यान काँग्रेस-शिवसेना युतीवर प्रताप सरनाईक यांनी मोठं भाष्य केलं. मिरा भाईंदर सर्व एकत्र आले त्यांनी आघाडी स्थापन केली आहे.मिरा भाईंदर शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. आम्ही महापालिकेत काही चुकीचं घडू देणार नाही. 16 नगरसेवकांनी पक्ष न बघता शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. चुकीचं काही होत असले तर त्यावर अंकुश ठेवला जाईल. त्यांचं वर्चव आहे, मान्य करावे लागले. राज ठाकरे यांनी मला पाठिंबा दिला हे माहिती नाही. त्यांचे अभार मानतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.
दरम्यान अकोला, चंद्रपूर, सोलापूर इथेही विविध पक्ष भाजपविरोधात एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध आघाड्या तयार होत आहे. विविध गटांची स्थापन होऊन भाजपविरोधात महापालिका काबीज करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा अशी आघाडी तयारी करण्याची घाई राजकीय पक्षांना झालेली दिसत आहे.





