उमरेड (नागपूर) – पंचायत समिती, उमरेड अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा–२०२६ मध्ये जीवन विकास वनिता विद्यालय, उमरेडच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या विज्ञान मेळाव्यात विद्यालयाची विद्यार्थिनी कु. खुशबू प्रवीण सयाम हिने आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि प्रभावी सादरीकरणाच्या बळावर प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जीवन विकास वनिता विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या चमूनेही प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांची मेहनत आणि जिद्द याबरोबरच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. निखाडे व सौ. मोहतकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. चौधरी, पर्यवेक्षक श्री नंदनवार तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
सात शिक्षकांच्या ध्येयवेडातून उभा राहिलेला शिक्षणाचा वटवृक्ष
जीवन विकास शिक्षा मंडळ, उमरेडची वाटचाल ही संघर्ष, समर्पण आणि शिक्षणनिष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे. गावातील उच्चशिक्षित, विद्यासंपन्न आणि शिक्षणाबद्दल तळमळ असलेल्या सात ध्येयवेड्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने जीवन विकास या शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
स्वतःच्या सुख-सुविधांचा विचार बाजूला ठेवून, जणू स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या शिक्षकांनी शिक्षणाचा हा पाया उभारला. त्यांच्या त्यागातून उभे राहिलेले हे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले असून, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि विविध स्पर्धात्मक क्षेत्रांत संस्था सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा आणि क्षमता दडलेली आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, वैज्ञानिक उपकरणे आणि विविध स्पर्धांसाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि उद्योग क्षेत्राने अशा शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ देण्याची गरज व्यक्त होत आहे.
विज्ञान मेळाव्यातील हे यश केवळ दोन प्रथम क्रमांकांचे नसून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळालेली नवी ओळख आहे. कु. खुशबू प्रवीण सयाम, विज्ञान नाट्योत्सवातील विजेत्या विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षिका, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षकवृंद यांचे या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सात ध्येयवेड्या शिक्षकांनी पेरलेल्या शिक्षणाच्या बीजाचे आज वटवृक्षात झालेले रूपांतर आणि त्या वटवृक्षातून घडणारी नवी पिढी—हीच जीवन विकास शिक्षा मंडळाच्या कार्याची खरी ओळख आहे.
Author: इंजि. प्रदीप चौधरी
लेखक नागपूर येथील रहिवासी असून अमरावती येथील कृषिदेव खत कारखान्यात कारखाना व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेशाने ते यांत्रिकी अभियंता आहे, त्याचबरोबर समाजातील आरोग्य आणि फिटनेस जनजागृतीसाठी ते हेल्थ अँड लाइफ कोच म्हणूनही कार्यरत असून समाजप्रबोधनाचे कार्य सक्रियपणे करतात. साहित्याची आवड असल्यामुळे ते सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य व जीवनशैली विषयक लेखन नियमितपणे करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांचे लेख सोशल मीडिया मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक लेखणीद्वारे ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयांवरील महत्त्वपूर्ण विचार जनतेसमोर मांडतात. आपले विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून ते नेहमी प्रखरतेने मांडत असतात.





