पुतण्याच्या आठवणीने शरद पवार झाले भावूक, ‘आज अजित असता तर…’; दोन्ही राष्ट्रवादी च्या विलीनीकरणाबाबत केला मोठा खुलासा

SHARE:

मुंबई – अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून, ही घटना आम्हा सर्वांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे. हा महाराष्ट्रावर झालेला एक मोठा आघात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कठीण काळात लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आणि परिस्थिती सावरण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवार यांनी ज्या तडफेने आणि पद्धतीने काम केले, तीच परंपरा पुढे चालू ठेवावी लागेल. आमच्या कुटुंबातील आणि पक्षातील नवीन पिढी हे कार्य आणि वारसा नक्कीच पुढे नेईल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार अजित पवार यांच्या आठवणींनी गहिवरून गेले होते. अत्यंत कापऱ्या स्वरात आणि भावूक होऊन ते म्हणाले की, अजित पवार हे एक असामान्य कर्तृत्व असलेले नेते होते. त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या दिवसाची सुरुवात पहाटे ६ ते ७ वाजता करत असत. शरद पवार पुढे म्हणाले की, जर आज अजित पवार हयात असते, तर ते घरात दिसले नसते, तर लोकांमध्ये जाऊन थेट जमिनीवर (फिल्डवर) काम करताना दिसले असते. अशा कर्तृत्ववान नेत्याचे अचानक सोडून जाणे हा राज्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्याने आता आम्हा सर्वांची आणि विशेषतः नवीन पिढीची जबाबदारी वाढली आहे, आणि नवीन पिढी हे आव्हान नक्कीच पेलईल.

यावेळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती उघड केली. दोन्ही गटांमध्ये पुन्हा सुसंवाद असावा आणि त्यांनी एकत्र यावे, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पडद्यामागे चर्चा सुरू होत्या. या चर्चा अत्यंत सकारात्मक होत्या आणि त्याचे नेतृत्व स्वतः अजित पवार आणि जयंत पाटील हे करत होते. या दोघांनीच सर्व वाटाघाटी केल्या होत्या. दोन्ही पक्षांनी आणि गटांनी एकत्र येऊन काम करावे यावर एकमत झाले होते आणि येत्या १२ तारखेला यासंदर्भातील निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार होता. मात्र, आता या घटनेमुळे या प्रक्रियेत खंड पडला असल्याचे चित्र दिसत आहे, असा खुलासा शरद पवार यांनी केला.

Leave a Comment

अधिक वाचा