युवा उद्योजक व सेवाभावी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न; उपेक्षित समाज महासंघ व कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचा उपक्रम

SHARE:

अमरावती (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानिक उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तथा सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध परिवाराच्या वतीने ‘सन्मान कर्तुत्वाचा’ या अभियानांतर्गत युवा उद्योजक, प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा पुष्पगुच्छ, फुले दाम्पत्यांची प्रतिमा व विचारपुष्प देवून दि.१५ जुलै २०२६ ला सन्मानित करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले, वसंतराव भडके, मधुकर आखरे, आनंदराव देशमुख, निलय गुलालकरी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी गेली चार दशके महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापनातून स्वावलंबनाचे धडे दिले. सेवानिवृत्तीनंतरही समाजप्रबोधन व सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतीशील करतात, म्हणून त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बी.ई. ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन नोकरीच्या मागे न लागता स्वतः‌चा पेन्ट व्यवसाय सुरु करून इतर गरजवंतांना नोकरी देणारे इंजि. अतुल एन. होले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजेंद्र वाढोकर हे कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर प्रशासकीय अधिकारी (RTO Officer) म्हणून सर्वपरिचित आहेत. गेल्या ३० वर्षापासून सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंध परिचय महासंमेलनाच्या लोकचळवळीचे ते आधारवड आहेत. त्यांच्या या विधायक कार्याचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणीही गॉड फादर नसताना स्वतःच्या स्वप्रेरणेतून बिल्डर व्यवसाय सुरु केला. चिकाटी व सतत परिश्रमातून यशस्वी उद्योजक झालेले श्री. प्रकाश कुबडे व त्यांच्या सहचारिणी सौ. जयश्री कुबडे यांचे माळी ऋणानुबंध महिला आघाडी च्या माध्यमातून महिलांचे संघटन, महिलांचे सबलीकरण – सक्षमीकरणासाठी छोटे छोटे उद्योगासाठीचे यशस्वी प्रयत्नाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

“बहुजन समाजातील युवकांनी स्वतःचा उद्योग सुरू करून समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे.”
महासंघाचे अध्यक्ष – प्रा. श्रीकृष्ण बनसोड

याप्रसंगी अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी स्वरचित प्रासंगिक अभंग गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आजचे युवक हे उद्याचे या देशाचे आधारस्तंभ आहेत. बहुजन समाजातील अनेक युवक हे उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. त्यांच्यातील वैफल्यता वाढत आहे, तेव्हा त्यांनी स्वतःचा छोटासा का होईना उद्योग सुरु करावा. जिद्य, चिकाटी व सततच्या परिश्रमातून व्यवसायात यशस्वी होऊन स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगावे व समाजाचे-देशाचे नाव उज्वल करावे.”

 

“प्रामाणिकपणा हा व्यवसायाचा आत्मा असतो.”

समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले विचार व्यक्त करताना म्हणाले की, “प्रामाणिकता हा व्यवसायाचा आत्मा असतो. उद्योजक अतुल होले, प्रकाश कुबडे, जयश्री कुबडे हे आपला व्यवसाय प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी इतर व्यवसायिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे तर डॉ. सुरेश पाटील आणि राजेंद्र वाढोकार यांनी सत्यवर्तनाने नोकरी करून सेवानिवृत्ती नंतरही ते समाजकार्य करीत आहेत. समाजाला अशाच व्यक्तीची गरज असते.” असे विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे संचालन मधुकर आखरे तर सुधीर घुमटकर यांनी मान्यवर, सत्कारकर्ते व उपस्थितांचे आभार मानले.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा